Tuesday, May 2, 2017

वेरुळचं ‘रामेश्वर’!

लेखक: इंद्रनील बंकापुरे 


एखादा देश नक्की काय आहे? त्या देशाची जगातली ओळख काय? त्या देशानी या जगाला काय दिलंय? यावरून त्या त्या देशाचे एक निश्चित स्थान अधोरेखित होत असते. भारताचा विचार करताना, सर मोनियर विल्यम्स हे १८९९ सालच्या संस्कृत इंग्रजी कोशामध्ये लिहितात, “हिंदूंनी खगोलशास्त्र, औषधशास्त्र, बीजगणित, भूमिती, अंकगणित, रसायनशास्त्र , इ. विषयात लक्षणीय प्रगती केली आहेच. व्याकरणशास्त्रातील त्यांचे प्रावीण्य इतके उत्तम आहे की त्याबद्दल बोलायला नकोच. यातील काही शास्त्रे तर या विषयाची संकल्पना युरोपातील बहुतेक देशात तयार होण्याअगोदरच प्रगत अवस्थेत भारतात अस्तित्वात होती.” आपलं दुर्दैव म्हणा, जो पर्यंत परदेशातून कुणी आपल्या गोष्टींच कौतुक करत नाही तो पर्यंत आपल्याला त्या गोष्टीच महत्व कळत नाही.

औरंगाबाद जिल्ह्यातील वेरूळ येथील जगप्रसिद्ध लेणी बघायला देश विदेशातून हजारो लोक येत असतात आणि चौतीस लेण्यांचा समूह असलेल्या या डोंगरात एकरूप होतात. या लेण्यांमध्ये बौद्ध, हिंदू आणि जैन अशा तीन प्रकारच्या लेण्यांचे समूह आपल्याला बघायला मिळतात. काळजाचा वेध घेणारं, आधी कळस मग पाया अस प्रचंड मोठं कोरलेलं ‘कैलास लेणं’ हे भारतीय कलेचा सर्वोच्च बिंदू. पण याच समूहातील “रामेश्वर लेण्याबद्दल” आज आपण जाणून घेणार आहोत.

कैलास लेण्यापेक्षा थोडे आधी म्हणजे साधारण सातव्या शतकाच्या उत्तरार्धात हे रामेश्वर लेणं कोरलं गेलं. आकाराने जरी लहान असले तरी यातील शिल्पांचे सौंदर्य कैलास पेक्षा तसूभरही कमी नाही.

विस्तीर्ण आवारातून या लेण्याकडे निघाल्यावर नजर पडते ती पावित्र्याचं लक्षण असलेल्या आणि मकरावर उभ्या असलेल्या गंगेकडे. गंगेच्या समोर कासवावर उभी असलेली यमुना आहे पण त्या मूर्तीची मोठ्या प्रमाणात तोडफोड झाली आहे.

आत गेल्यावर डावीकडे असणाऱ्या दालनात कार्त्तिकेय, महिषासुरमर्दिनी यांची शिल्पं आहेत आणि त्यातील भिंतीवर आपल्याला तीन कथा बघायला मिळतात. त्यातली पहिली आहे ती म्हणजे- साक्षात ब्रम्हदेव शिवासाठी मागणी घालायला आले तो प्रसंग, मध्यभागी शिव आणि पार्वती यांचे विवाह विधी, तर शेवटी तपश्चर्या करणारी पार्वती आणि ब्रम्हचारी रूप घेऊन आलेला साक्षात महादेव. असे अनेक प्रसंग बघत आपण उजवीकडे असलेल्या दालनात जातो.

याच दालनात आहे भव्य असा नटराज. सृष्टीची उत्पत्ती – स्थिती – लय, जीवन आणि मृत्यू यांच्यात संतुलन ठेवायचं काम शिव आपल्या संथ लयीतल्या नृत्यामधून करतोय. त्याच्याच पुढे आपल्याला दिसतो तो सप्तमातृका पट आणि काल-काली यांची शिल्पं. सप्तमातृका या जीवनाचे प्रतीक तर काल आणि काली हे मृत्यूचे निर्देशक. विविध देवांच्या शक्ती म्हणजे या मातृका – शिल्पपटात सुरवातीला असतो तो वीरभद्र आणि शेवटी गणपती, यांच्या मध्ये ब्रम्हाणी, महेश्वरी, कौमारी, वैष्णवी, वाराही, इंद्राणी, नरसिंही या मातृका असतात. या दालनात शेवटी दिसतो तो भारतीय तत्वज्ञानाचं मूर्तीरूप, मृत्यूलाही मृत्यू आहे आणि मृत्यूलाही जन्म आहे हे दाखवणारं काल आणि काली यांचं शिल्पं, यात काळाच्या पायाला मिठी मारलेला एक छोटा सांगाडाही दिसतो ज्याला काली मागे ओढत आहे.

या आणि अशा असंख्य कलाकृती अनेक अज्ञात कलाकारांनी आपल्यासाठी करून ठेवल्या आणि ते अजरामर झाले. एवढ्या महान कलाकृती करूनसुद्धा कुणालाही त्यावर आपलं नाव टाकावासं वाटलं नाही कारण कला ही देवासाठी अर्पण करायची, तो देवच आपल्याकडून हे करून घेतोय ही भावना त्या पाठीमागे होती.

जात, धर्म, पंथ यांच्या साखळ्या तोडून एक कला म्हणून या गोष्टींकडे बघणं गरजेचं आहे. आज त्या तुटलेल्या, मोकळ्यावर पडलेल्या मूर्ती आपण बघतो, अशा वास्तूंच्या भिंतींवर आपल्याच लोकांनी केलेली घाण आपण बघतो, हे थांबायला हवं. या मूर्ती, वास्तू, चित्र आपण आता तयार नाही करू शकत, पण सांभाळू तर नक्कीच शकतो. आणि ही आपल्या सर्वांचीच जबाबदारी आहे.

संदर्भ:
'भारतीय मुर्तीशास्त्र – डॉ. नि.पु.जोशी
'वेरूळ दर्शन'- गो. बं. देगलूरकर, श्री. उदयन इंदुरकर.


Indraneel Bankapure

M.A Mass Communication and Journalism
M. A Indology

Part of the Central government's team for Documentary making on Vulnerable tribes in Gujarat and their Habitat.

Working on the development of Heritage and culture tourism

2 comments:

  1. नारसिंही ही मातृका इतकी प्रचलित आहे का? इंद्राणी नंतर चामुंडा असते.

    ReplyDelete