Friday, April 21, 2017

"पाषाणहृदयी.....प्राचीन भारतीय प्रस्तर कला"

लेखिका: नीलिमा थत्ते 


मी एक सच्ची भारत प्रेमी आहे. देशातल्या सर्व सकारात्मक नकारात्मक गोष्टींसह देशावर प्रेम करणारी! आपल्या प्रतिज्ञेमधलं एक वाक्य मला फार आवडतं--"माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे" खरंच, आसेतुहिमाचल किती वेगळे प्रदेश, वेष, भाषा, खाणे-पिणे, पद्धती नि संस्कृती! किती प्रकारच्या कला नि कौशल्ये! पण नेहमीच कुतूहल वाटतं की या सगळ्याची सुरुवात कशी झाली असेल? १४ विद्या,  ६४ कलांच्या या देशात 'कला' म्हणावं असं काय नि कधी जन्माला आलं? संगीत-नृत्य-नाट्य-चित्र-शिल्प अश्या माध्यमांतून माणूस काही व्यक्त करत असतो, सांगत असतो. पण हे नेमकं केंव्हा सुरु झालं असेल? भाषेचं माध्यम नसताना माणूस कसा व्यक्त होत असेल?असंख्य प्रश्न! मागोवा घ्यायचा म्हटलं तर आपण थेट अश्मयुगीन चित्रांपर्यंत जाऊन पोचतो. त्या पूर्वीही माणसाची दगडी हत्यारे हाही एक प्रकारे कलाविष्कारच म्हणावा लागेल. पण ती गरज होती जगण्याच्या संघर्षातली! गुहेतली किंवा खडकावरची चित्रं मात्र अश्मयुगीन मानवाच्या कलेचा एक महत्वाचा पुरावा आहे. किंबहुना त्या काळातल्या मानवाच्या जीवनात डोकावण्यासाठी आवश्यक खिडकी म्हणजे ही चित्रे! यांना गुहा चित्रे, प्रस्तर चित्रे किंवा पाषाण चित्रे म्हणून ओळखतात.


वेगवेगळ्या युगांचा कालक्रम:

पूर्व पुराश्म युग इ.स.पू. १७५००० ते इ.स.पू.३०००० वर्षे

मध्य पुराश्म युग इ.स.पू. ४०००० ते इ.स.पू.१२००० वर्षे

उत्तर पुराश्म युग इ.स.पू. १५००० ते इ.स.पू.१०००० वर्षे

मध्याश्म युग इ.स.पू. १२००० ते इ.स.पू. ३५०० वर्षे

नवाश्म युग इ.स.पू. ८००० ते इ.स.पू. २५०० वर्षे

ताम्रपाषाण युग इ.स.पू. ३५०० ते इ.स.पू.१५०० वर्षे

महापाषाण युग इ.स.पू. १००० ते इ.स. १०० वर्षे (विशेषतः द. भारतात)

भारतात अश्मयुगीन प्रस्तरचित्रे सर्वप्रथम सापडली मिर्झापूर जिल्ह्यात ‘सोहागीघाट’ येथे. आर्चिबाल्ड कार्लाइलने १८६७-६८ मध्ये शोध लावला; पण कुठे प्रसिद्ध केलाच नाही. अर्थात त्याची काही टिपणे त्याने त्याचा मित्र रेव्हरंड जवळ ठेवली होती. नंतर व्ही.ए. स्मिथने ती प्रकाशित केली. त्यात त्याने रंगासाठी गेरूचा वापर, प्राण्यांच्या शिकारीची दृश्ये, भाले, धनुष्य बाण अशी हत्यारे यांचा उल्लेख केला आहे. त्यानंतर १९५७ मध्ये पद्मश्री सन्मान प्राप्त कै. डॉ.वाकणकरांनी लावलेला मध्य प्रदेशातील भीमबेटका गुहांचा शोध तर खळबळ माजवणारा ठरला. २० चौरस किमी च्या परिसरात ७ टेकड्यांवर मिळून तब्बल ६०० हून अधिक शैलाश्रय सापडले आणि त्यांपैकी जवळजवळ ४०० गुहांमध्ये चित्रे मिळाली. आतापर्यंत आपल्या देशात अशी १५० ठिकाणे आणि त्यात १००० गुहांचा शोध लागला आहे. मध्य भारतात यांचे प्रमाण जास्त आहे. आश्चर्य म्हणजे विविध ठिकाणच्या या चित्रांमध्ये विलक्षण साधर्म्य आढळते. तशीच काड्यांची माणसे, तशीच नृत्याची नि शिकारीची दृश्ये! तसेच पळणारे प्राणी!


काय असतात ही चित्रे? का नि कशी काढली असतील? रंग कसे केले? कशाने रंगवली? पुन्हा प्रश्न ! पण आता त्यांची उत्तरे अभ्यासकांनी मिळवली आहेत.

बहुधा ही चित्रे म्हणजे प्राण्यांची शिकार, मासेमारी, छोट्या चकमकी, नृत्य, दैनंदिन जीवन असे प्रसंग असतात. आतापर्यंत ३०-३५ प्रकारचे प्राणी यातून दाखवले आहेत. गाय, बैल, कुत्रा, गवा, हरीण, सांबर, हत्ती, गेंडा, वाघ, चित्ता असे अनेक! प्राण्यांच्या चित्रात आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे गर्भार गाय व हरिणी दाखवताना पोटातले भाग दाखवले आहेत आरपार पाहिल्यासारखे. x ray style म्हणतात तसे.

पाल, विंचू, खेकडा, बेडूक, खार असे छोटे जीव सुद्धा आहेत . पक्ष्यांमध्ये मोर, शहामृग यांचा समावेश आहे. होय भारतात चक्क शहामृग होता पण काळाच्या ओघात इथून नामशेष झाला! (शहामृगाच्या अंड्याच्या कठीण कवचावर कोरीवकाम केलेले असे काही तुकडे भीमबेटकाला सापडलेत. महाराष्ट्रात पाटणे गावीही असे अवशेष मिळाले ज्यांचा काळ २५००० वर्षे पूर्व असा मानला जातो.)

तर या चित्रात सूर्य,चंद्र,चांदण्या,नद्या,डोंगर असेही असतात. मानवाकृती बहुधा काड्यांसारख्याच असतात. त्यातही स्त्री पुरुष वेगळे दाखवण्याची धडपड असते. निव्वळ रेषांचा वापर करून नृत्यातली गती, शिकारीतली आक्रमकता अप्रतिम रित्या व्यक्त होते. अन्न ,फळे गोळा करताना, पाट्यावर वाटताना, अशा स्त्रिया सुरेखरित्या दाखवल्या आहेत.

या चित्रांसाठी वापरलेले रंग बघता एकूण १६ छटा सापडल्या आहेत. पण प्रामुख्याने लाल, पांढरा आणि हिरवा हे तीन रंग दिसतात. गम्मत आहे हेच तीन रंग आपल्या ध्वजात सुद्धा आहेत!

आता लाल रंगासाठी काय वापरत होते तर चक्क गेरू! चुनखडीपासून पांढरा आणि हिरव्या गारेपासून हिरवा! दगडांची भुकटी पाण्यात, प्राण्यांच्या चरबीत किंवा हाडांच्या मगजात, अंड्याच्या पांढऱ्या बलकात कालवून वापरत असावेत. रंग साठवण्यासाठी कवटी, हाडांची नळी किंवा शहामृगाच्या अंड्याच्या टरफलाचा वाडगा!

रंगवायला कुंचला हवा- प्राण्यांच्या कातडीचे किंवा खारीच्या शेपटीचे केस झाडाच्या काटकीत खोचून तो बनवत. गुहेच्या अंधाऱ्या भागात चित्रे काढायची तर उजेड हवा- मग शेवाळ्याची वात नि चरबीचे तेल, की झाला दिवा!

या चित्रांवरून काय काय समजते?

तत्कालीन प्राणी,पक्षी, केशभूषा,वेशभूषा, चालीरीती, हत्यारे,अलंकार कितीतरी तपशील! पुरुषांचे गुडघ्यापर्यंत आखूड वस्त्र, कातड्याचे अंगरखे, तोंडावर प्राण्यांचे मुखवटे, डोक्यावर शिंगांचे शिरोभूषण, स्त्रियांच्या बांगड्या, गळ्यात दागिने अशा बऱ्याच गोष्टी कळतात. हत्यारे म्हणजे भाले, धनुष्य बाण, सुरे, काठ्या दिसतात प्रामुख्याने.

आता हे सगळं कशासाठी चितारलं असेल? बरेच अंदाज बांधले गेले आहेत. वेळ जात नाही म्हणून सहज किंवा गुहेचं घर सुशोभित करण्यासाठी असेल. आजही गोंड,वारली वगैरे आदिवासी घरांच्या भिंती अशा पद्धतीने रंगवताना बघतो आपण. कदाचित अशी चित्रे काढणे हा एखाद्या धार्मिक कृत्त्याचा भाग असेल. सुरुवातीच्या काळात जादू-टोणा किंवा यातु-विद्या ही धर्माची प्राथमिक अवस्था होती. जेम्स फ्रेझर ने Golden Bough नावाची १३ खंडांची एक ग्रंथ मालिका लिहिली. त्यात त्याने जगभरातल्या जमाती समाज यांच्या धार्मिक कल्पना गोळा करून लिहिल्या आहेत. त्यात जादू विषयक साम्य सिद्धांत त्याने मांडला आहे. आफ्रिकेत पुरुष शिकारीला गेले की स्त्रिया घरी खेळ खेळत. एकीला गवा वा डुकराची भूमिका देऊन इतर सर्व शिकारीचा अभिनय करत. खेळात ती पकडली गेली की तिकडे पुरुषांनाही उत्तम शिकार मिळणार ही समजूत! त्याच प्रकारे कदाचित अशी चित्रे काढली की शिकार मिळणार, दुभते प्राणी, शेतीला बैल मिळणार अशी समजूत असेल!

मला तर कधी असंही वाटतं की काही आपत्तीची चाहूल लागल्याने पुढे कुणाला तरी समजावं म्हणूनही चित्रे काढली असतील.. अजूनही या चित्रांचे गूढ पूर्णपणे उलगडलेले नाही.

मी ३८ वर्षांपूर्वी भीमबेटकाला गेले होते, चित्रे पाहिली सुद्धा; पण तेंव्हा त्यांचे महत्व तितकेसे माहीतच नव्हते मला! मध्ये बराच काळ लोटला. मग ६-७ वर्षांपूर्वी पंचमढीला बेगम महाल जवळच्या जंगलात अशीच चित्रे पाहायला मिळाली.पण ती बरीच खराब झालेली नि अस्पष्ट होती. मात्र एक छान संधी नुकतीच मला मिळाली.

झालं असं की मी टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचा भारतीय विद्या हा दोन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण केला. मग त्यात शिकलेली मंदिरे बघण्यासाठी हंपी बदामी ऐहोळे पट्टडकल असा दौरा केला. आता असं जायचं ठरवल्यावर त्या भागाविषयी वाचायला, माहिती गोळा करायला सुरुवात केली. तेंव्हा अनेगुंडी विषयी कळलं . हंपी पासून ५ किमी वर असलेले हे गाव रामायण काळात किष्किंधा नगरी म्हणून ओळखले जात होते. आजही इथे पम्पा सरोवर, अंजनेरी पर्वत आहेत. पुढे हरिहर बुक्क विजयनगर वसवण्यापूर्वी इथेच राहत होते. पण अनेगुंडीचा इतिहास फार प्राचीन आहे. महापाषाण युगीन दफने इथे बघायला मिळतात आणि साधारण त्याच आसपासची ही प्रस्तर चित्रे! अनेगुंडीची ही चित्रे त्या मानाने फारशी माहित नाहीत. खाजगी मालकीच्या जागेत आहेत. शेतातून चालत जाऊन मोठ्या पाषाणाच्या मागे अरुंद वाटेने गेल्यावर एक विस्तीर्ण सपाट जागा दिसते जी चारही बाजूंनी मोठमोठ्या पाषाणांनी वेढलेली आहे. तिथेच एका खडकावर गेरूने रंगवलेली काही चित्रे आहेत. मी यांविषयी आमच्या हंपीच्या मार्गदर्शकाला विचारल्यावर त्याला इतका आनंद झाला कि खुद्द हंपीतली अशी एक जागा त्याने उत्साहाने दाखवली! तिथे दलदल असल्याने जवळ जाऊन बघणे शक्य नव्हते म्हणून लांबूनच फोटो काढले. काही प्राणी नि मनुष्याकृती होत्या. फक्त लाल रंग वापरलेला होता.

अनेगुंडीच्या चित्रात मला थोडे वेगळेपण जाणवले. इथे शिकार,लढाईची दृश्ये नाहीत. मानवाकृती, प्राणी यातून दैनंदिन जीवन दाखवण्याचा प्रयत्न आहे. चौकोन,त्रिकोण यांद्वारे घरे दाखवली आहेत. चौकटीला रेलून किंवा घरात उभ्या मानवाकृती आहेत. गुहाचित्रात न दिसणारा साप मात्र इथे आहे. शिवाय एक मोठा फणाधारी नाग गुहेच्या छतावर आहे जो झोपूनच पाहावा लागतो.

सर्वात कोड्यात टाकणारी गोष्ट म्हणजे पाषाणाच्या पुढे आलेल्या भागाच्या छतावर आतल्या बाजूने रंगवलेली आकृती! एका वर्तुळात १२ छोटी दगडासारखी वर्तुळे ,एक मनुष्याकृती, त्रिकोण,नागमोडी रेषा आणि काही वस्तूंचे आकार... महापाषाण युगीन दफनांचे प्रतिनिधित्व करणारी ही आकृती आहे असे आधी मत होते. पण २०१० मध्ये भारतीय पुरातत्त्वाच्या अभ्यासकांनी इथे भेट दिली आणि टी. एम. केशवा व त्याचे सहकारी यांनी वेगळाच निष्कर्ष काढला. त्यांच्या मते हा प्रागैतिहासिक मानवाने काढलेला नकाशा आहे. समजा तिथल्या पाषाणांवरून चढून वर जाऊन खाली बघितले तर कसे दिसेल याचा नकाशा म्हणजे ते चित्र आहे असे त्यांचे मत आहे. कोणत्याही साधनांशिवाय निव्वळ डोळे आणि स्मरणशक्ती वापरून काढलेला हा नकाशा विलक्षणच म्हणावा लागेल. आजही नकाशात डोंगर त्रिकोणाने दाखवतो, तसेच त्यात दाखवले आहेत. अरुंद मार्गही दाखवला आहे! याच्या काळाविषयी इ.स.पू. १५०० ते इ.स.पू. १०००० वर्षे अशी विविध मते आहेत, नेमकी निश्चिती झालेली नाही.

खरे तर अशी चित्रे म्हणजे प्रत्येकाच्या कल्पना शक्तीला भरपूर वाव आहे! बघा फोटोतून तुम्हालाही सापडेल काही!! भीमबेटकाच्या चित्रांविषयी खूप अभ्यास झाला आहे आणि खूप माहिती उपलब्धही आहे. पण अजूनही अनेगुंडी सारख्या जागा आहेत अभ्यासकांना खुणावणाऱ्या! गरज आहे त्या जपण्याची, त्यांच्यापर्यंत पोचण्याची आणि त्यांचे गूढ उकलण्याची! डॉ. मीनाक्षी दुबे पाठक यांनी मध्य प्रदेशात आणि नुकतेच लडाख भागात या संदर्भात खूप काम केले आहे त्या करीत आहेत . अशाच अधिकाधिक संशोधकांची गरज आहे. तरच आपल्या प्राचीन संस्कृतीचं चित्र अधिकाधिक स्पष्ट होईल आणि आपला भव्य वारसा जगापुढे येईल.




Neelima thatte
डॉ. नीलिमा थत्ते या वैद्यकीय व्यावसायिक असून २५ वर्षे पिंपरी-चिंचवड येथे बालरोगतज्ज्ञ म्हणून कार्यरत होत्या. या वाटचालीत ज्या गोष्टी करावयाच्या राहून गेल्या असे वाटते त्या करण्यासाठी आणि सुगम संगीतासारखे स्वतःचे छंद जोपासण्यासाठी त्यांनी २०१२ मध्ये व्यवसाय निवृत्ती पत्करली. पक्षी विज्ञान,फुलपाखरे,छायाचित्रण,वनस्पती शास्त्र यांविषयी विविध अभ्यासक्रम त्यांनी पूर्ण केले आहेत. तसेच त्या संदर्भात मासिकांत आणि वर्तमानपत्रांत लेखनही केले आहे. लहान मुलांना पक्षी परिचय करून देणारी "कसा मी? असा मी" आणि एकटीने केलेल्या आसाम-अरुणाचल दौऱ्याविषयी "पूर्व अपूर्व" या दोन लेखमाला विशेष लोकप्रिय झाल्या. आकाश निरीक्षण आणि खग्रास सूर्यग्रहणाचे छायाचित्रण हे त्यांच्या आवडीचे विषय आहेत.

नुकताच त्यांनी टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचा "भारतीय विद्या-पारंगत" अभ्यासक्रम प्रथम क्रमांकाने पूर्ण केला. सध्या तिथेच "संस्कृत पारंगत" अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थिनी म्हणून शिक्षण घेत आहेत.




No comments:

Post a Comment