Wednesday, April 19, 2017

"प्राचीन भारतातील मंगल चिन्हे"

लेखिका: आरती कुलकर्णी


  प्राचीन संस्कृतींचा अभ्यास करत असताना अनेक विषयांचा व प्रवाहांचा विचार करणे क्रमप्राप्त ठरते. विविध धर्म कल्पना, त्यांचा विस्तार, जनमानस, सामाजिक तसेच राजकीय स्थित्यंतरे बघत असताना तत्कालीन साहित्य, कला यांमधून ते कसे व्यक्त होत असते, हे चिकित्सक दृष्टीने पाहणे हा एक भारावून टाकणारा अनुभव आहे.

  एकमेकांबरोबर समांतर चालणारे विचारप्रवाह, विशिष्ट धारणाशक्तीने प्रेरित होऊन विकसित होणार्‍या धर्मभावना, कधी त्यांचा एकत्रित, बरोबरीने होणारा प्रवास, तर कधी एकमेकांना छेद देणार्‍या कल्पना, काळानुरूप त्यांचे होणारे संक्रमण, हे सर्व तत्कालीन साहित्य तसेच कलेच्या माध्यमातून अभ्यासता येते.

  भारतीय संस्कृतीचा अभ्यास करताना प्रतीकांचा, मूर्तींचा अभ्यास करणे म्हणूनच गरजेचे होते आणि आहे. काळानुरूप होणारे मूर्तींमधील, प्रतीकांमधील बदल कित्येक गोष्टींची जाणीव करून देत असतात. प्रतीके का, कोठे, कशी वापरली गेली, त्यांचे असणे तसेच त्यांचे नसणे खूप काही सांगत असते. बदलांची जाणीव करून देत असते. काळानुसार देवतांमध्ये तसेच त्यांच्या अंकन पद्धतीत बदल होत असतात. वेगवेगळ्या संप्रदायांचा एकमेकांवरील प्रभाव, काही देवतांना गौण रूप प्राप्त होणे, काही देवता मोठ्या होणे इ. प्रकारही या अभ्यासातून दिसतात.

  नंतरच्या काळातील सांप्रदायिक चढाओढी, विलय, एकत्रीकरण, मैत्री, या प्रक्रियासुद्धा आपल्याला अशा प्रकारच्या अभ्यासातून स्पष्ट दिसू लागतात. परकीय देवांचा, कलांचा प्रभाव दिसतो आणि परंपरांच्या आधारे हळूहळू, परंतु निश्चीतपणे झालेली प्रक्रिया या सर्वांतून उलगडत जाते.

  सर्व प्राचीन संस्कृतींमध्ये प्रत्येक काळात मानवाने विविध प्रतीके वापरलेली दिसतात. ही प्रतीके म्हणजे धार्मिक तसेच सामाजिक जाणीवांचे प्रकटीकरण असते,असे म्हणता येईल. प्राचीन काळात मूर्तीपूजेच्या आधीदेखील विविध प्रतीके पूजनीय होती. त्याचप्रमाणे मंगलचिन्हे म्हणून देखीलअनेक प्रतीके निरनिराळ्या संकृतींमध्ये दिसत होती. त्यांची प्राचीनता मानवी इतिहासाइतकीच जुनी असावी.

  निरनिराळ्या प्राचीन उत्खनीत अवशेषांचा अभ्यास करताना असे दिसते, की काही विशिष्ट चिन्हे विशिष्ट कारणांसाठी वापरलेली आहेत. सिंधू संस्कृती अथवा जगातील इतर प्राचीन संस्कृतींच्या अवशेषांमध्ये आढळणार्‍या पुराव्यांवरून हे सहज लक्षात येते. यात सापडणारी मृद्-भांडी, चित्रकलेचे अवशेष, मुद्रा इत्यादी गोष्टींवरून असे दिसते, की काही आकार, चिन्हे यांचा विशिष्ट गोष्टींची प्रतीके म्हणून वापर होत होता. काही चिन्हांबरोबर शुभ – अशुभ असे विचार / भावना जोडण्यात आलेल्या दिसतात. काही काळानंतर मंगलमय प्रतीकांचा वापर, या प्रतीकांना प्राप्त झालेले धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व, यांवर अनेक विद्वानांनी संशोधन केले आहे.

  भारतात प्रतीकांचा वापर इतिहासपूर्वकाळापासून दिसून येतो. कलेची अभिव्यक्ती तसेच पूजनीय गोष्टी म्हणून, शोभा व सौंदर्य प्रतीत करण्यासाठी म्हणून अनेक विविध चिन्हे वापरलेली दिसतात. यापैकी काही चिन्हे काळाच्या ओघात धार्मिक अथवा मंगल प्रतीके म्हणून पुढे आलेली दिसतात.

  निरनिराळ्या सम्राटांचे राज्यविस्तार, धर्मांचा होणारा प्रसार,यांमधून विविध कल्पनांची देवाणघेवाण होत असे. कला, संस्कृती यांतूनअनेक चिन्हे व प्रतीके सर्वदूर वापरली गेल्याचे दिसून येते. भारतीय संस्कृतीचा, येथील धर्मांचा विस्तार राष्ट्रांच्या सीमा ओलांडून अनेक ठिकाणी झालेला दिसतो. अनेक संकल्पना व प्रतीकेसुद्धा भारताबरोबरच भारताबाहेरील अनेक देशांमध्ये आढळून येतात. याची ठळक उदाहरणे म्हणून स्वस्तिक व श्रीवत्स या चिन्हांकडे बघता येईल.

  यामध्ये कालानुरूप अनेक बदल झालेले दिसून येतात. प्रतीकांचे अर्थ, व्यक्त करण्याची पद्धत, महत्त्व आदी सर्व गोष्टींमध्ये फरक पडलेला दिसतो.काही प्रतीके काळाच्याओघात नष्ट झालेली दिसतात, नवीन चिन्हे उदयाला आलेली दिसतात तसेच काही प्रतीके टिकून राहिली,तरी त्यांचे संदर्भ बदलत जाताना दिसतात.

  प्राचीन भारतीय प्रतीकांच्या बाबतीत विचार करत असताना वेगवेगळ्या याद्या अथवा उल्लेख सापडतात.

  अष्ट-मंगल ही कल्पना खूप पूर्वीपासून समाजात लोकप्रिय असलेली दिसते.अष्ट-मंगल म्हणजे मंगलकारक आठ वस्तूंचा समुदाय. ही कल्पना वैदिक नसून थोडी नंतरच्या काळातील आहे.

  पौराणिक अष्टमंगलांमध्ये गाय, ब्राह्मण, अग्नी, सोने, तूप, सूर्य, जल व राजा यांचा समावेश होत असे. प्राचीन साहित्यामध्ये यांचे निरनिराळे संदर्भ सापडतात. सिंह, वृषभ, हत्ती, पूर्णकुंभ, पंखा, माला, भेरी व दीपअशीही अष्टमंगले सापडतात. साधारणत: सर्वांना मान्यअसलेली व भारतभर आढळणारी अष्टमंगल  प्रतीके म्हणजे, मीन-मिथुन, देव-विमानगृह, श्रीवत्स, वर्धमान, त्रिरत्न, पुष्पदाम, इंद्रयष्टी किंवा वैजयंतीआणि पूर्णकलश.

  काही लिखित संदर्भांवरून असे समजते, की पृथ्वी जिंकायला निघालेले राजे, तसेच सेनापती, मंगल होण्याच्या इच्छेने अष्टमंगलमाला धारण करीत असत.

अष्टमंगल माला, सांची तोरण 

  इ. पू. २ / ३ र्‍या शतकापासून या प्रतिकांचे अंकन सांची, भारुथ, अमरावती येथील स्तूपांवर, उदयगिरी सारख्या ठिकाणी असलेल्या लेखांत, तसेच इतरही अनेक कलाप्रकारांत दिसू लागते.याचाच अर्थ या काळापर्यंत मंगलचिन्हे समाजात खूप खोलवर रुजलेली होती. त्यांचा वापर सुद्धा समाजाच्या सर्व वर्गांत धार्मिक व सांस्कृतिक कार्ये व कला यांतून होत होता.

  या सर्व मंगल चिन्हांबद्दल इतके बोलल्यावर आता त्यापैकी प्रमुख मंगल चिन्हांचा अर्थ व त्यामागची कल्पना बघू.

स्वस्तिक: हे सर्वदूर प्रसिद्ध असलेले मांगल्याचे प्रतीक आहे. हे चिन्ह प्राचीन काळापासून वैभव, संपन्नता, प्रगती आणि विजयाचे प्रतीक समजले जाते.

श्रीवत्स: संपत्ती, सुबत्ता, ऐश्वर्य यांची स्वामिनी असलेल्या लक्ष्मीचे प्रिय (बाळ) अशी श्रीवत्स या शब्दाची फोड करता येते.

श्रीवत्स हे प्रामुख्याने लक्ष्मीचे प्रतीक मानले गेले आहे. सुख व समुद्धीसाठी ते प्राचीन काळापासून पूजनीय मानले गेले आहे. याचमुळे हे मांगल्याचे प्रतीक प्राचीन भारतीय कलेचा महत्वाचा भाग असल्याचे दिसते. ऐहिक जगात अर्थातच सर्वसामान्य लोकांना धन, संपत्ती व त्यातून येणारी सुबत्ता हवी असते. यामुळेच त्याचे प्रतीक असणारे श्रीवत्स जनमानसात खूप लोकप्रिय, तसेच पूजनीय राहिलेले दिसते.

श्रीवत्स चिन्हाला खूप मोठा इतिहास आहे.तीन हजारांपेक्षा जास्त वर्षांची परंपरा लाभलेले हे चिन्ह सर्व प्राचीन भारतीय धर्मांत म्हणजेच वैदिक, जैन व बौद्ध धर्मांत वापरलेले दिसते. हेच स्वस्तिक चिन्हाबाबतही म्हणता येते.

शंख: शंखातून शुद्ध, सात्वीक असा धर्मनाद ऐकू येतो व त्यामुळे अजाणतेपणातून जाग येते अशी कल्पना केलेली आहे. शंख हे हिन्दु धर्मात विष्णूच्या हातातील महत्वाचे आयुध म्हणून सर्वत्र दिसते.

मीनद्वय: मीन युगुल हे निर्मितीचे, सुखाचे प्रतीक म्हणून सर्वत्र वापरलेले दिसते.

पद्म: कमळ हे शुद्धता, सुचिता यांचे प्रतीक समजले जाते. अज्ञान, दुर्गुण यांना मागे सारून, खाली ठेवून त्यांच्या चिखलातून पवित्र असे कमळ वर येते. या कल्पनेमूळेच अनेक देवता या पवित्र कमलासनावर बसलेल्या दिसतात.

छ्त्र: हे राजसत्ता व त्यामूळे येणारे अधिकार यांचे प्रतीक म्हणून बघितले जाते. एखादा सम्राट अथवा धर्म सर्वांना आपल्या छ्त्रछायेखाली घेतो व सर्व दुःखांपासून संरक्षीत करतो ही अतीशय महत्वाची कल्पना छ्त्र दाखवून प्रतीकत्मक पद्धतीने दर्शविली जाते.

  याचप्रमाणे भेरी, ध्वज, पताका इ. चिन्हे युद्ध, त्यातील विजय, त्यानंतरचा आनंद व उत्सव यासंबधातील आहेत.

  घट, कुंभ हे मंगल चिन्ह अनेक अर्थाने महत्वाचे मानले जाते. जलाने भरलेला कुंभ हा जणू अमृतघटाचेच प्रतिनिधीत्व करतो. सर्व पवित्र व वैभवशाली गोष्टींचा संग्रह कुंभात होतो आणि त्यामुळेच तो मंगल व पूजनीय ठरतो. घट हे स्त्रीच्या गर्भाशयाचे प्रतीक मानले जाते त्यामुळे ते सर्जनाचे व सुफलतेचे सुद्धा महत्वाचे प्रतीक आहे. नवरात्रात यामुळेच घटस्थापनेला व त्याच्या पूजेला खूप महत्व असते.

  ही प्राचीन चिन्हे व प्रतिके कुठे कुठे दिसतात व अभ्यासता येतात ? याचे उत्तर अगदीच सोपे आहे. प्राचीन साहित्यात यांचे भरपूर संदर्भ मिळतात. त्याचप्रमाणे, अनेक प्रकारच्या प्राचीन भौतिक साधनांमध्ये, कला अवशेषांमध्ये ही चिन्हे सापडतात.

* मृद्-भांडी
* प्रस्तर शिल्पे
* मूर्ती
* चित्रे
* लेख
* नाणी
* मुद्रा
* स्थापत्य

  हाथीगुंफा येथील प्रसिद्ध असलेल्या खारवेल राजाच्या लेखात सुरुवातीलाच श्रीवत्स व स्वस्तिक ही शुभ चिन्हे कोरलेली दिसतात.सर्व लेखांची, महत्वाच्या लेखनाची सुरुवात ’स्वस्तिश्री’ या मंगलाने करण्याची प्रथा अगदी अलिकडील काळापर्यन्त चालू असलेली दिसते.

खारवेल लेख, हाथीगुंफा, इ. स. पूर्व २ रे शतक 

  प्राचीन काळातील नाण्यांवरसुद्धा अनेक शुभ-चिन्हे उमटविलेली असत. कुणिन्द राजा अमोघभुती याच्या चांदीच्या या नाण्यावर स्वस्तिक, श्रीवत्स, वेदिका-वृक्ष, नंदीपाद, इ. चिन्हांचे सुंदर अंकन दिसते.

कुणिन्द, अमोघभूती

  जैन कलेत, मथुरा कलाशैलीत, मूर्तींच्या आधीपासून आयागपट्ट खूप प्रमाणात तयार होत होते. कंकाली-टिला व मथुरेच्या आसपासच्या ठिकाणांहून अनेक आयागपट्ट मिळालेले आहेत.

  साधारणतः जैन तीर्थंकर मध्यभागी, बाजूने मंगलचिन्हे तसेच खालील बाजूस दानलेख असे याचे स्वरूप असते. यांमधे अष्टमंगल चिन्हे अतिशय सुंदररित्या दाखविलेली असतात.

आयागपट्ट, मथुरा, कुशाण काळ

  जैन, बौद्ध व हिंदू या तीनही धर्मांनी काही मंगलचिन्हे आपलीशी केल्याचे दिसते. त्या चिन्हांना विशिष्ट प्रतीकांसाठी योजलेले दिसते. सार्वभौम असणे, संपत्ती, समृद्धी, आरोग्य, विजय या गोष्टी सर्वच धर्मांतील लोकांना हव्याशा वाटणार्‍या आहेत. म्हणूनच श्रीवत्स, स्वस्तिक अशी चिन्हे धर्माच्या चौकटी मोडून सर्वांनाच प्रिय व पूजनीय होत्या.

  नंतरचा काळ पाहता प्रतीकांकडून मूर्ती पूजेकडे वळणे क्रमप्राप्त व नैसर्गिक होते, असे दिसते. प्रतीकांमध्ये उपास्य देवतेला बघणे याचीच पुढची पायरी म्हणजे मानवी रूपात इच्छीत देवाला आणणे व त्याचे सर्व गुण, आयुधे, शक्ती इ. मूर्त स्वरूपात मांडणे. अर्थात, काही मंगल व पूज्य चिन्हांवरून, प्रतीकांवरून पुढील काळातील काही देवतांच्या मूर्ती तयार झाल्या असाव्यात, उदा. अभिषेकलक्ष्मी.

  असे असले तरीही या चिन्हांमागे असलेल्या भावना अजूनही समाजमानसात रुजलेल्या आहेत, ताज्या आहेत. निरनिराळी तोरणे, पूजा साधने, चैत्रांगणासारख्या पारंपारिक रांगोळ्या इ. च्या रूपाने ही मंगल चिन्हे भारतीय समाजाचा आजही अविभाज्य भाग बनून राहिलेली दिसतात.




Arati Kulkarni

आरती कुलकर्णी यांनी माहिती व तंत्रज्ञान विषयातील पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. सुमारे अठरा वर्षांपासून त्या संगणक क्षेत्रात कार्यरत आहेत. गेली काही वर्षे त्या प्राचीन भारतासंबधी अनेक विषयांचा अभ्यास करीत आहेत. अलिकडेच त्यांनी भारतीयविद्येचा पारंगत अभ्यासक्रम विशेष प्राविण्यासह पूर्ण केला आहे.
मूर्तीशास्त्र, प्राचीन भारतीय कला तसेच स्थापत्य, नाणकशास्त्र, परंपरा व प्रतीके या विषयांच्या अभ्यासामधे त्यांना विशेष रुची असून या विषयांवरील त्यांचे काही लेख व शोध निबंध प्रकाशीत झाले आहेत. त्यांनी श्रीवत्स या मंगलचिन्हावर आधारीत संशोधन प्रकल्प केला आहे.

18 comments:

  1. Arati, Excellent and some new information.
    Makarand Bhide,

    ReplyDelete
  2. Arati, Excellent and some new information.
    Makarand Bhide,

    ReplyDelete
  3. Excellent article!!
    Any thoughts about translating in English for an even wider audience?

    ReplyDelete
    Replies
    1. Sure Mohini! I will ask for English versions too.. To all the writers... Thanks a lot!

      Delete
    2. Sure Mohini ! Thanks for your suggestion !
      .. As our blogger says :)

      Delete
  4. आपण मंगलचिन्हे वापरतो खरी, पण त्यांचा इतिहास,प्रवास यांविषयी फारसं माहित नव्हतं! अतिशय उत्तम लेख!!!

    ReplyDelete
  5. सुंदर लेख.

    "प्रतीकांकडून मूर्ती पूजेकडे वळणे क्रमप्राप्त व नैसर्गिक होते" याबद्दल एक शंका - या वाक्यावरून असं प्रतीत होतं की आधी प्रतीक-पूजा होती आणि त्याचं रुपांतर मूर्तिपूजेत झालं. मात्र प्रत्यक्षात असं झालं,की प्रतीकपूजा आणि मूर्तिपूजा समांतर चालू होत्या?

    ReplyDelete
    Replies
    1. रोहित,
      धन्यवाद.
      प्रतीक – पूजेचा इतिहास मानवी इतिहासाइतकाच जुना आहे असे म्ह्णता येईल. आधी अमूर्ताची पूजा, मग निसर्गातून प्रतिके आली, पूजनीय झाली, मग आपल्या आराध्य व पूजनीय शक्तींना मूर्त स्वरूपात आणण्याची कला अवगत झाली असे दिसते. इ. स. च्या सुरुवातीच्या शतकांमधे भारतात मूर्तीकलेने बाळसे धरले. मूर्तीपूजा खूप लोकप्रिय झाली. अर्थात प्रतीक-पूजा पूर्णपणे थांबली नाहीच.. आजही बदललेल्या स्वरूपात ती अनेक ठिकाणी चालू असलेली दिसतेच !

      Delete
  6. Excellent Arati ... Too good ... Keep it up ..Sarika

    ReplyDelete
  7. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  8. खुप छान माहिती दिली आहे. आरती असे अनेक लेख लिहुन एक पुस्तक प्रकाशित कर. It will be a good reference for future generations.

    ReplyDelete
  9. आपण खूप छान माहिती दिली आरती मॅडम....
    चांदीच्या पात्रावरील (टाक) प्रतिमा कधी पासून तयार करण्यात आली असावी. जसे महिषासूर मर्दिनी इत्यादी.

    ReplyDelete