Friday, July 21, 2017

'जयवर्मा' द्वितीय – ख्मेर साम्राज्याचा संस्थापक

ऐतिहासिक चरित्रे: भाग २- जयवर्मा दुसरा  

लेखक: नरेंद्र वेलणकर 

हिंदू धर्म आणि संस्कृती ही पूर्वीपासूनच सध्याच्या भारताच्या सीमा ओलांडून बाहेरील देशात जसे सध्याचे पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांग्लादेश, थायलंड, कंबोडिया, जावा, लाओस येथेही होती. ‘अंकोरवाट’ नावाने सुप्रसिद्ध असलेले विष्णू मंदिर सर्व जगातील पर्यटकांना गेली अनेक दशके आकर्षित करून घेत आहे. साधारण अडीचशे फुटबॉलची मैदाने मावतील एवढे क्षेत्रफळ असणारे हे विष्णू मंदिर त्याच्या स्थापत्यशास्त्रासाठी सर्वज्ञात आहे. जगातील सर्वात मोठी धार्मिक वास्तू असणारे हे स्थापत्य भारतात नसून कंबोडिया देशात आहे, आणि ते सुद्धा विष्णू मंदिर हे फारच थोड्या लोकांना माहित असेल. बाराव्या शतकात सूर्यवर्मन (द्वितीय) या राजाच्या कारकिर्दीत हे मंदिर बांधले गेले. या मंदिराचे वैभव पाहण्यासाठी जगभरातून चाळीस लाखाहून जास्त पर्यटक जातात व स्थापत्यशास्त्र पाहून थक्क होतात. कोणतेही प्रचंड मोठे स्थापत्य अचानक बांधले जात नाही, यासाठी कित्तेक शतकांची राजकीय, सामाजिक आणि आर्थिक स्थिरता लाभणे हे फार आवश्यक असते. त्यामुळे याची बीजे ही आधीच्या शतकात त्यातील राजांच्या कार्यातून दिसून येतात. ज्या राजाच्या कर्तृत्वामुळे पुढे आपल्याला ख्मेर साम्राज्याचा डोलारा उभा राहिलेला दिसतो, ज्या राजाने ख्मेर लिपी ही राजमान्य करून तिचा वापर सुरु केला आणि जवळ जवळ चाळीसहून जास्त वर्ष राज्य करून त्यास एक मान्यता मिळवून दिली तो हा राजा म्हणजे ‘जयवर्मा द्वितीय’.

जयवर्मा द्वितीय याचा जन्म कुठे आणि कधी झाला या बद्दल विश्वासार्ह माहितीजरी उपलब्ध नसली तरी त्याने कंबोडियामधील लहान लहान राज्यांना/लोकसमूहांना एकत्र आणून इ.स. ८०२ मध्ये ख्मेर राज्याची सुरुवात केली हे तेथील पुराव्यांवरून कळते. काही अभ्यासकांच्या मते या आधीच्या काळात तो जावा मध्ये मांडलिक म्हणून होता असे परंतु कठपुतळी सारखे राज्य करणे काही मान्य होईना म्हणून कंबोडियामध्ये राज्य स्थापनेस सुरुवात केलेली दिसते. जावा मधील टोळ्यांकडून आक्रमणाचा त्रास होत होता त्यामुळे त्याने बऱ्याच राजधान्या बदललेल्या दिसतात. समुद्रतीरापासून आत राजधानीची स्थाने नेलेली दिसतात असेही काही पाश्चिमात्य अभ्यासक/संशोधक म्हणतात. परंतु यात मुख्यत्वे ताब्यात असलेल्या भागाच्या मध्यभागी राजधानी असावी असे जाणूनबुजून केलेले दिसते. त्यातून कोणतेही षड्यंत्र अथवा कट, कारस्थाने करण्यास जास्त वेळ मिळू नये आणि राजकीय विरोधकांनी/शत्रूनी काहीही करण्याच्या आत राजधानी बदलेली असलेली कित्यांचे सर्व यत्न वाया जावेत असापण विचार असावा असा एक कायास आहे. जयवर्मा द्वितीय याने प्रथम व्याधपूर येथे राजधानी केली नंतर शंभुपुर, इंद्रपुर, हरीहरालय व अमरेन्द्रपुर या ठिकाणी हलवलेली दिसते.

यानंतर जावा कडून कंभूज देशावर जी आक्रमणे होत होती ती पण कमी झालेली होती. जयवर्मा द्वितीय याने मोठ्या प्रमाणावर भूभाग ताब्यात घेतलेला दिसतो, राज्य कसे वाढवावे, त्याचे रक्षण कसे करावे याचा एक विशिष्ठ विचार पण त्याच्या मनात होता हे दिसून येते. ज्यास आजच्या काळात आपण ‘blue print’ म्हणतो ती त्याच्या डोक्यात नक्की पक्की असावी आणि त्याप्रमाणे त्याने राज्य वाढवलेले दिसते. हे सर्व करत असताना त्यास आवश्यक म्हणजे ‘ख्मेर’ ही पण राजाश्रयाने त्याने वाढवलेली दिसते. ‘ख्मेर’ लिपीचा पण वापर मोठ्या प्रमाणावर सुरु केलेला दिसतो. यातूनच अ-क्षर अशा गोष्टींना दिलेले महत्व दिसून येते, काहीतरी आपल्या नंतर राहावे हा विचार दिसून येतो. यामुळेच कि काय पण पुढे त्याने ‘देवराज’ पंथाची स्थापना केलेली दिसते. देवराज या शब्दाचे दोन अर्थ दिसून येतात ते म्हणजे राजा हाच देवाचा अंश म्हणजे देव किंवा देवांचा राजा म्हणजे इंद्र (असेही काही पाश्चिमात्य संशोधकांचे मत आहे). यात राजा हाच देव हा अर्थ जास्त सयुक्तीक वाटतो. राजा हा सर्व जनतेचा सांभाळ करणारा, त्यांचे रक्षण करणारा त्यामुळे सुद्धा त्यास देवाचा अवतार मानले गेले आहे आणि मृत्युनंतर तो देवरूप होतो म्हणजे देवच होतो असा भाव आहे.

राजा गादीवर आल्यावर त्याच्या नावाने एक राष्ट्रीय देवालय (मंदिर) बांधले जात असे आणि राजाच्या मृत्यूनंतर त्या राजास एक बिरूद दिले जाई व त्या नावाने पूजा केली जात असे. हे मंदिर नेहमीच त्या राजाच्या उपास्य देवतेचे असे (उदा. शिव, विष्णू इ.). जयवर्मा द्वितीय यास ‘परमेश्वर’ या नावाने संबोधले जाई. यातही राजाचे मृत्युनंतरचे नाव हे जिवंत असतानाच्या नावापेक्षा वेगळेच असे.

स्डोक कोक थोम (sdok kok thom) येथील शिलालेखातून याच्या कार्यकालात याच्याकडे ‘हिरण्यदामन’ नावाचा तांत्रिक आला होता व त्याच्याकडून आपल्या सीमा सुरक्षित करून घेण्यासाठी तांत्रिक कार्य करवून घेतले ते करण्यास हिरण्यदामनने त्यास शैव होण्यास सांगितले. त्याने राजपुरोहितास (शिवकैवल्य) त्याच्याकडील विद्यांचे प्रशिक्षण दिले. पुढे या राजाने फर्मान काढले की या देऊळाची पूजा शिवकैवल्याच्या घराण्यात राहावी तशी ती पुढे चालू होती.

जयवर्मा द्वितीयच्या राजकीय काळात त्याचे अर्थकारण हे प्रामुख्याने शेती आणि मासेमारी यावर अवलंबून होते. त्याच्या राजधानीच्या नवीन जागा पाहताना त्याने जास्तीत जास्त शेतीला उपयुक्त जागा पाहिलेल्या दिसतात. जास्तीत जास्त सपाट आणि भरपूर पाणी असणारे प्रदेश आजूबाजूला असतील याची काळजी घेतली. ‘टोनले सॅप’ नावाच्या १२,८७६ चौ.कि.मी. क्षेत्रफळावर पसरलेल्या मोठ्या जलाशयाच्या जवळ त्याने हरीहरालय, अमरेंद्रपुर या राजधान्या वसवल्या.

एकंदरच जयवर्मा द्वितीयच्या पूर्ण आयुष्याकडे पाहता सर्वात जास्त काळ राज्यावर राहिलेला राजा होता हे प्रामुख्याने दिसते, दूरदर्शीपणा, धोरणात्मक नीती दिसून येते. याचे नाव त्याच्या मृत्यूनंतर ३०० वर्षानंतर लिहिलेल्या शिलालेखात पण दिसून येते या वरून त्याचा पराक्रम हा नक्कीच लोकांच्या लक्षात राहणारा होता यात शंका नाही. इंद्रवर्मा याने इ.स. ८८९ साली बांधलेल्या ‘प्रीह को’ या मंदिरात मध्यभागी असलेल्या मंदिरात ‘जयवर्मा द्वितीय’ याचे मंदिर दिसते. याने स्थापन केलेले ‘ख्मेर’ साम्राज्य इ.स. १४३१ पर्यंत होते(६२९ वर्ष). पुढील काळात याचा विस्तार फार मोठ्या प्रमाणावर झालेला आपल्याला दिसतो. ११व्या शतकात ख्मेर साम्राज्य हे परमोच्च शिखरावर होते.या काळातील ख्मेर साम्राज्याचा केंद्रबिंदू ‘अंकोर’ हे जयवर्मा द्वितीयच्या हरीहारालायच्या जवळच राहिला असे दिसते. जयवर्मा द्वितीय या राजामुळे हिंदु धर्म हा भारताबाहेरही तेव्हा राहिला, वाढला असे नक्कीच म्हणता येईल.



Narendra Velankar
नरेंद्र वेलणकर हे स्थापत्य अभियांत्रिकीचे पदवीधर असून ते गेली १५ वर्षे यासंबंधी व्यवसाय करीत आहेत. प्राचीन भारताबद्दलच्या विविध विषयांचा ते अभ्यास करीत आहेत. प्राचीन मंदिरे, त्यांचे स्थापत्य हे कायमच त्यांना आकर्षित करीत राहिले आहेत. अलीकडेच त्यांनी भारतीय विद्येचा पारंगत अभ्यासक्रम विशेष प्राविण्यासह पूर्ण केला आहे. फलटण या गावावर त्यांनी संशोधन प्रकल्प सादर केलं आहे तसेच जेजुरी येथे सापडलेल्या ताम्रपटावर शोध निबंध सादर केलेला आहे.

Friday, June 23, 2017

"राजस योगी"

ऐतिहासिक चरित्रे: भाग १ - संत ज्ञानेश्वर

लेखक: डॉ. राहुल देशपांडे 


अनेक वेळा लोकोत्तर महात्म्यांचे आयुष्य देवत्त्वाच्या वलयामुळे कायमच गूढ धुक्यात गुरफटून राहते आणि कापुरासारखे तेजाने झळाळून जाताना काही क्षण आसमंत सात्विक प्रकाशाने उजळवून स्वत:च आसमंतात विलीन होऊन जाते. समुद्राकाठच्या वाळूप्रमाणे काही बोचरे ओरखडे हातावर ठेवून अलगद निसटून जाणारे क्षण आणि या लोकोत्तर महात्म्यांच्या सर्वार्थी दर्शनाच्या आधी ब्रह्मांडात विरून गेलेल्या अभंगांच्या संवेदना अशाच काहीशा हुरहुर लावणा-या भावना पेरून जातात. आपल्या भाबड्या जाणिवांमुळे आणि संवेदनांवर साचलेल्या जाचक रूढी परंपरांच्या पांढरामुळे अनेक महात्मे त्या गूढ कथेतील नायक म्हणूनच जनमानसाच्या विचारांमध्ये उरतात तर काही पौराणिक कथांशी नाळ जोडत अवतार म्हणून देवघरात सजतात.

संत ज्ञानेश्वर...., तेराव्या शतकाच्या उत्तरार्धातील अध्यात्माच्या आकाशामध्ये आढळस्थानी असणारे इतिहासाचे एक अलौकिक पान. दीपकी दीपक I मावळल्या ज्योती I घर भरी वाती I शून्य झाल्या II  ज्ञानेश्वरांचे कार्यही प्रकट झाल्यावर अशाप्रकारे केवळ साहित्यिक परिघातात तरी अडकून राहते किंवा सिध्दयोग्याचा मुकूट घालून अलौकिक पराशक्तीच्या क्षितिजाशी जोडले जाते. त्यांची केवळ तत्त्वज्ञ, कवी, सिद्ध, संत किंवा केवळ गीता भाष्यकार अशी कुठलीही एक ओळख नुसतीच अपूर्ण नाही, तर त्या लोकोत्तर पुरुषाचा अपमान करणारी आहे. म्हणूनच ज्ञानेश्वरांचे चरित्र पुरातत्वाच्या संशोधकांना, इतिहासाच्या अभ्यासकांना, तत्वज्ञानाच्या विचारवंताना, भाषाशास्त्राच्या व्याकरणकारांना, काव्यावर नितांत प्रेम करणा-या साहित्यिकांना, तत्कालीन समाजाला जाणून घेणा-या समाजशास्त्रातील अभ्यासकांना, संत साहित्यावर नितांत प्रेम असणा-या मराठी मनाला आणि भक्तीच्या पताका फडकविणा-या वारकरी संप्रदायातील साधकाला, अशा सर्वांनाच भुरळ घालणारे आहे.

संत ज्ञानेश्वर समजून घेण्यासाठी प्रथम ढोबळपणे तरी ज्ञानेश्वरपूर्व काळात काही क्षण मनापासून हरवून जाणे महत्त्वाचे आहे. तो काळ महाराष्ट्रासाठीही खूप महत्त्वाचा आहे. चालुक्य – राष्ट्रकूट राजवटीत महाराष्ट्र घडत होता, सजत होता. देवगिरीच्या यादावांमुळे संपूर्ण महाराष्ट्र राजकीय स्थैर्य उपभोगत होता. राजकीय स्थैर्याबरोबर ओघाने येणा-या असंख्य समांतर विषय आणि घटकांमध्ये तत्कालीन प्रदेश समृध्द होत होता. मात्र हे असतानाही साधारण नवव्या-दहाव्या शतकात धार्मिक जगतात खूप मोठे बदल घडत होते. वैदिक, बौध्द आणि जैन या तीनही तत्कालीन प्रमुख धर्मांमध्ये तांत्रिक वाममार्गाचा शिरकाव झाला होता. सर्वच पंथात आणि सर्व स्तरांवर सामाजिक जाणिवाही बदलत होत्या. मास, मद्य, मैथुन या तोपर्यंत रूढी आणि धर्मबाह्य असणा-या घटकांना अनेक विद्वानांनी नियमात बसवून तत्कालीन पंथात सामावून घेतले होते. प्रत्येक धर्मात सिध्द तयार होत होते. जैन सिद्ध, बौध्द सिध्द, नाथ सिध्द असे अनेक उपपंथ तयार होत होते. श्री शैल पर्वत या सर्व साधनामार्गातील महत्त्वाचा दुवा ठरत होता. कालामुख, कापालिक, शाक्त, नाथ, महानुभाव अशा विविध उपपंथांनी समाजात आपले स्थान बसविले होते. शंकराचार्यांनी जनमानसात प्रसिद्ध केलेली पंचायतन पूजा, हरिहराच्या आढळून येणा-या मूर्ती अशा विविध घटकांनी तत्कालीन समाजातील अनेक उपपंथांना एकत्रित बांधून ठेवण्यासाठी निर्मिलेल्या या धार्मिक संकल्पना मन थक्क करतात. मात्र या संकल्पना समाजात रूजत असतानाच सर्व धर्मात झालेला हा वाममार्गाचा प्रसार अनेक कोडी घालणारा आहे.

मात्र धार्मिक संकल्पनांच्या या जंगलात हरवून जात असताना शैवमतवादी बसवेश्वर आणि आल्लम प्रभू यांनी रुजवलेला वीरशैव पंथ आणि तांत्रिक मार्ग बाजूला सारून गोरक्ष नाथांनी नव्याने घडविलेला नाथ पंथ सामाजिक - धार्मिक संवेदनांसाठी खूप महत्त्वाचे ठरतात. म्हणूनच वर्णाश्रम व्यवस्था हिच समाजाची संपूर्णपणे ओळख असताना, राजकीय स्थैर्य असूनही धार्मिक संकल्पना आणि त्यामुळे संपूर्ण सामाजिक मानसिकता तांत्रिक वाममार्गाच्या भोव-यात सापडलेली असताना भक्ती मार्गाला समाजाचा श्वास बनवून, नाथ पंथाला नवीन ओळख देत सर्व समाजाला एकसंघ बांधून ठेवणा-या ज्ञानेश्वरांचे अस्तित्व तत्कालीन समाजासाठी किती महत्वाचे होते हे जाणवते. त्यांचे तत्कालीन अस्तित्व केवळ प्रेरणादायक नसून नक्कीच सात्विक दिशादर्शक होते यात शंका नाही. ज्ञानेश्वर आणि त्यांच्याशी संबंधित घटकांचा विचार करताना या काळाचा असा ढोबळ विचार जरी केला तरी ज्ञानेश्वरांचे महत्त्व कळण्यास, त्यांच्या विचारांचा धागा शोधण्यास आणि त्यांच्या काव्यातील साहित्याच्या लाटांखाली खोल लपलेले तत्वज्ञान समजण्यास मदत होऊ शकेल आणि या सर्वांचा विचार करता ज्ञानेश्वर हे केवळ कवी किंवा तत्त्वज्ञ न राहता समाजाला दिशा देणारे अध्यात्मिक जगताचे नेते म्हणून पण मान्यता पावतात यात शंका नाही.

आजपर्यंत ज्ञानेश्वरांच्या साहित्यावर आणि त्यातील तत्त्वज्ञानावर सखोल अभ्यास झालेला आहे. ह.भ.प.सोनोपंत दांडेकर, स. के. नेउरगावकर, साखरे महाराज, जोग महाराज, कृ. के. आठवले अशा संत प्रवृत्तीच्या असंख्य मान्यवरांनी ज्ञानेश्वरांच्या तत्त्वज्ञानावर प्रासादिक लिखाण केले आहे. रा.चिं. ढेरे, पांगारकर, माटे, शं.रा. तळघटी अशा पुरातत्त्वातील आणि संत साहित्यातील अभ्यासकांनी यावर विस्तृत अभ्यासपूर्वक लेखन आणि चिंतन केलेले आहे. या लेखन प्रपंचाचा उद्देश ज्ञानेश्वरांचे तत्त्वज्ञान हा नसल्याने येथे हा विषय जास्त विस्तारपूर्वक मांडण्यात आलेला नाही. संत ज्ञानेश्वरांच्या कार्याचा कार्यकारण भाव शोधाणारा हा प्रामाणिक प्रयत्न आहे.

नाथ संप्रदाय आणि पंढरीची वारी असा दुहेरी वारसा ज्ञानेश्वरांना त्यांच्या स्वत:च्या आणि मातुल घराण्यातून मिळाला होता. तत्कालीन समाजातील शैव आणि वैष्णव पंथात सुरू असणा-या वर्चस्वाच्या लढाईमध्ये हा योगायोग खास लक्षात ठेवण्यासारखा आहे. ज्ञानेश्वरांचे पिता, विठ्ठलपंत जेव्हा तीर्थयात्रेला गेले तेव्हा ते प्रथम श्री पर्वतावर गेले असा उल्लेख आहे. श्री पर्वत आणि कदली बनाचे तत्कालीन धार्मिक जगातील महत्त्व अशाने नव्याने अधोरेखित होते यात शंका नाही. तत्कालीन वर्णाश्रम व्यवस्थेप्रमाणे ज्ञानेश्वरादि भावंडांना आरूढपतिताची संतती म्हणून दोल किंवा वोट म्हणत असत. या अनुशंगाने तत्कालीन समाजाने त्यांना दिलेली वागणूक माणुसकीच्या नात्याने जरी संपूर्ण अयोग्य होती तरी बोपोदेवसारखे पंडित देवगिरीमध्ये असताना तत्कालीन वर्णाश्रम व्यवस्थेप्रमाणे ते नियम समाज व्यवस्थेच्या चाकोरीतच होते असेच म्हणावे लागेल. लहानपणापासून भोगत असलेल्या हालअपेष्टा आणि अवहेलनेमुळे ज्ञानेश्वरांनी वैतागून जाऊन ताटी लावून बसणे आणि त्यामुळे मुक्ताबाईंना स्फुरलेले ताटीचे अभंग याचा साहित्य आणि तत्वज्ञान म्हणून अभ्यास झालेला आहे. मात्र सामाजिक आणि कौटुंबिक भावनेने याकडे बघणेही तितकेच गरजेचे आहे. ज्ञानेश्वरांपेक्षा वयाने लहान असलेल्या मुक्तेने योगी पावन मनाचा  म्हणून केलेला उल्लेख खूप बोलका आहे. संत आणि योगी – सिध्द यातील फरक जाणण्यासाठी या अभंगाचा सखोल अभ्यास होणे आवश्यक आहे. ज्ञानेश्वर आणि त्यांचे कार्य कळण्यासाठी पावन मनाचा योगी म्हणजे काय हे कळले तर या संताकडे अजून वेगळ्या नजरेने बघता येईल.

गीता भाष्य ज्ञानेश्वरी, अनुभूती प्रकट करणारा अनुभवामृत ग्रंथ, सर्वार्थी तत्त्वज्ञानाचा मेरू म्हणता येईल असा चांगदेव पासष्ठे ग्रंथ, अभंग आणि विराणी अशा असंख्य साहित्यातून ज्ञानेश्वर आपल्याशी संवाद साधतात. मात्र, प्रकट गुह्य बोले, विश्व ब्रह्मची केले असे वर्णन असणारे ज्ञानेश्वर आजही सामाजिक परिवर्तनाचे नेते म्हणून, भावनिक संवेदनांचे उद्गाते म्हणून, शंकराचार्यांचा अद्वैतवाद आत्मानुभूतीमुळे समाजात रुजविणारे प्रेषित म्हणून, जनमानसाला एकत्र करून पंढरीच्या विठूमध्ये कैवल्य शोधत भागवत धर्माला प्रतिष्ठा मिळवून देणारे वारकरी म्हणून, मुकुंदराजाच्या विवेकसिंधू प्रमाणेच मराठीला उच्चासनावर बसविणारे मराठी संत कवी म्हणून सर्वच परिघात उपेक्षित राहून केवळ लहान बहिणीला पाठीवर मांडे भाजून देणारे आणि दगडी भिंत चालविणारे एक अध्यात्मिक जादूगार म्हणून राहिले आहेत हे आपल्या महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. मात्र आजही, ज्ञानेश्वरांची संजीवन समाधी आणि आसपासचा परिसर पुराततत्व शाखेवर विश्वास ठेवणा-या, इतिहासावर प्रेम करणा-या, मराठी साहित्याचा आदर करणा-या आणि भावनांच्या सावलीत रमणा-या कोणालाही सश्रद्ध, सात्विक किंवा चिकित्सक भावनेने संशोधनासाठी खुणावीत नाही ही मोठी शोकांतिका आहे.

निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ता यांचे कार्य, त्या मागचा कार्याकारण भाव, तत्कालीन जाणीवा आणि ज्ञानेश्वरांनंतर साधारण दीड वर्षात तिघांनीही घेतलेल्या समाध्या हे आजपर्यंत न सुटलेले कोडे आहे. वाचकहो, गरज आहे ती प्रत्येकाने प्रामाणिक साधक बनायाची.....


Dr. Rahul Deshpande

Tuesday, May 2, 2017

वेरुळचं ‘रामेश्वर’!

लेखक: इंद्रनील बंकापुरे 


एखादा देश नक्की काय आहे? त्या देशाची जगातली ओळख काय? त्या देशानी या जगाला काय दिलंय? यावरून त्या त्या देशाचे एक निश्चित स्थान अधोरेखित होत असते. भारताचा विचार करताना, सर मोनियर विल्यम्स हे १८९९ सालच्या संस्कृत इंग्रजी कोशामध्ये लिहितात, “हिंदूंनी खगोलशास्त्र, औषधशास्त्र, बीजगणित, भूमिती, अंकगणित, रसायनशास्त्र , इ. विषयात लक्षणीय प्रगती केली आहेच. व्याकरणशास्त्रातील त्यांचे प्रावीण्य इतके उत्तम आहे की त्याबद्दल बोलायला नकोच. यातील काही शास्त्रे तर या विषयाची संकल्पना युरोपातील बहुतेक देशात तयार होण्याअगोदरच प्रगत अवस्थेत भारतात अस्तित्वात होती.” आपलं दुर्दैव म्हणा, जो पर्यंत परदेशातून कुणी आपल्या गोष्टींच कौतुक करत नाही तो पर्यंत आपल्याला त्या गोष्टीच महत्व कळत नाही.

औरंगाबाद जिल्ह्यातील वेरूळ येथील जगप्रसिद्ध लेणी बघायला देश विदेशातून हजारो लोक येत असतात आणि चौतीस लेण्यांचा समूह असलेल्या या डोंगरात एकरूप होतात. या लेण्यांमध्ये बौद्ध, हिंदू आणि जैन अशा तीन प्रकारच्या लेण्यांचे समूह आपल्याला बघायला मिळतात. काळजाचा वेध घेणारं, आधी कळस मग पाया अस प्रचंड मोठं कोरलेलं ‘कैलास लेणं’ हे भारतीय कलेचा सर्वोच्च बिंदू. पण याच समूहातील “रामेश्वर लेण्याबद्दल” आज आपण जाणून घेणार आहोत.

कैलास लेण्यापेक्षा थोडे आधी म्हणजे साधारण सातव्या शतकाच्या उत्तरार्धात हे रामेश्वर लेणं कोरलं गेलं. आकाराने जरी लहान असले तरी यातील शिल्पांचे सौंदर्य कैलास पेक्षा तसूभरही कमी नाही.

विस्तीर्ण आवारातून या लेण्याकडे निघाल्यावर नजर पडते ती पावित्र्याचं लक्षण असलेल्या आणि मकरावर उभ्या असलेल्या गंगेकडे. गंगेच्या समोर कासवावर उभी असलेली यमुना आहे पण त्या मूर्तीची मोठ्या प्रमाणात तोडफोड झाली आहे.

आत गेल्यावर डावीकडे असणाऱ्या दालनात कार्त्तिकेय, महिषासुरमर्दिनी यांची शिल्पं आहेत आणि त्यातील भिंतीवर आपल्याला तीन कथा बघायला मिळतात. त्यातली पहिली आहे ती म्हणजे- साक्षात ब्रम्हदेव शिवासाठी मागणी घालायला आले तो प्रसंग, मध्यभागी शिव आणि पार्वती यांचे विवाह विधी, तर शेवटी तपश्चर्या करणारी पार्वती आणि ब्रम्हचारी रूप घेऊन आलेला साक्षात महादेव. असे अनेक प्रसंग बघत आपण उजवीकडे असलेल्या दालनात जातो.

याच दालनात आहे भव्य असा नटराज. सृष्टीची उत्पत्ती – स्थिती – लय, जीवन आणि मृत्यू यांच्यात संतुलन ठेवायचं काम शिव आपल्या संथ लयीतल्या नृत्यामधून करतोय. त्याच्याच पुढे आपल्याला दिसतो तो सप्तमातृका पट आणि काल-काली यांची शिल्पं. सप्तमातृका या जीवनाचे प्रतीक तर काल आणि काली हे मृत्यूचे निर्देशक. विविध देवांच्या शक्ती म्हणजे या मातृका – शिल्पपटात सुरवातीला असतो तो वीरभद्र आणि शेवटी गणपती, यांच्या मध्ये ब्रम्हाणी, महेश्वरी, कौमारी, वैष्णवी, वाराही, इंद्राणी, नरसिंही या मातृका असतात. या दालनात शेवटी दिसतो तो भारतीय तत्वज्ञानाचं मूर्तीरूप, मृत्यूलाही मृत्यू आहे आणि मृत्यूलाही जन्म आहे हे दाखवणारं काल आणि काली यांचं शिल्पं, यात काळाच्या पायाला मिठी मारलेला एक छोटा सांगाडाही दिसतो ज्याला काली मागे ओढत आहे.

या आणि अशा असंख्य कलाकृती अनेक अज्ञात कलाकारांनी आपल्यासाठी करून ठेवल्या आणि ते अजरामर झाले. एवढ्या महान कलाकृती करूनसुद्धा कुणालाही त्यावर आपलं नाव टाकावासं वाटलं नाही कारण कला ही देवासाठी अर्पण करायची, तो देवच आपल्याकडून हे करून घेतोय ही भावना त्या पाठीमागे होती.

जात, धर्म, पंथ यांच्या साखळ्या तोडून एक कला म्हणून या गोष्टींकडे बघणं गरजेचं आहे. आज त्या तुटलेल्या, मोकळ्यावर पडलेल्या मूर्ती आपण बघतो, अशा वास्तूंच्या भिंतींवर आपल्याच लोकांनी केलेली घाण आपण बघतो, हे थांबायला हवं. या मूर्ती, वास्तू, चित्र आपण आता तयार नाही करू शकत, पण सांभाळू तर नक्कीच शकतो. आणि ही आपल्या सर्वांचीच जबाबदारी आहे.

संदर्भ:
'भारतीय मुर्तीशास्त्र – डॉ. नि.पु.जोशी
'वेरूळ दर्शन'- गो. बं. देगलूरकर, श्री. उदयन इंदुरकर.


Indraneel Bankapure

M.A Mass Communication and Journalism
M. A Indology

Part of the Central government's team for Documentary making on Vulnerable tribes in Gujarat and their Habitat.

Working on the development of Heritage and culture tourism

Friday, April 21, 2017

"पाषाणहृदयी.....प्राचीन भारतीय प्रस्तर कला"

लेखिका: नीलिमा थत्ते 


मी एक सच्ची भारत प्रेमी आहे. देशातल्या सर्व सकारात्मक नकारात्मक गोष्टींसह देशावर प्रेम करणारी! आपल्या प्रतिज्ञेमधलं एक वाक्य मला फार आवडतं--"माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे" खरंच, आसेतुहिमाचल किती वेगळे प्रदेश, वेष, भाषा, खाणे-पिणे, पद्धती नि संस्कृती! किती प्रकारच्या कला नि कौशल्ये! पण नेहमीच कुतूहल वाटतं की या सगळ्याची सुरुवात कशी झाली असेल? १४ विद्या,  ६४ कलांच्या या देशात 'कला' म्हणावं असं काय नि कधी जन्माला आलं? संगीत-नृत्य-नाट्य-चित्र-शिल्प अश्या माध्यमांतून माणूस काही व्यक्त करत असतो, सांगत असतो. पण हे नेमकं केंव्हा सुरु झालं असेल? भाषेचं माध्यम नसताना माणूस कसा व्यक्त होत असेल?असंख्य प्रश्न! मागोवा घ्यायचा म्हटलं तर आपण थेट अश्मयुगीन चित्रांपर्यंत जाऊन पोचतो. त्या पूर्वीही माणसाची दगडी हत्यारे हाही एक प्रकारे कलाविष्कारच म्हणावा लागेल. पण ती गरज होती जगण्याच्या संघर्षातली! गुहेतली किंवा खडकावरची चित्रं मात्र अश्मयुगीन मानवाच्या कलेचा एक महत्वाचा पुरावा आहे. किंबहुना त्या काळातल्या मानवाच्या जीवनात डोकावण्यासाठी आवश्यक खिडकी म्हणजे ही चित्रे! यांना गुहा चित्रे, प्रस्तर चित्रे किंवा पाषाण चित्रे म्हणून ओळखतात.


वेगवेगळ्या युगांचा कालक्रम:

पूर्व पुराश्म युग इ.स.पू. १७५००० ते इ.स.पू.३०००० वर्षे

मध्य पुराश्म युग इ.स.पू. ४०००० ते इ.स.पू.१२००० वर्षे

उत्तर पुराश्म युग इ.स.पू. १५००० ते इ.स.पू.१०००० वर्षे

मध्याश्म युग इ.स.पू. १२००० ते इ.स.पू. ३५०० वर्षे

नवाश्म युग इ.स.पू. ८००० ते इ.स.पू. २५०० वर्षे

ताम्रपाषाण युग इ.स.पू. ३५०० ते इ.स.पू.१५०० वर्षे

महापाषाण युग इ.स.पू. १००० ते इ.स. १०० वर्षे (विशेषतः द. भारतात)

भारतात अश्मयुगीन प्रस्तरचित्रे सर्वप्रथम सापडली मिर्झापूर जिल्ह्यात ‘सोहागीघाट’ येथे. आर्चिबाल्ड कार्लाइलने १८६७-६८ मध्ये शोध लावला; पण कुठे प्रसिद्ध केलाच नाही. अर्थात त्याची काही टिपणे त्याने त्याचा मित्र रेव्हरंड जवळ ठेवली होती. नंतर व्ही.ए. स्मिथने ती प्रकाशित केली. त्यात त्याने रंगासाठी गेरूचा वापर, प्राण्यांच्या शिकारीची दृश्ये, भाले, धनुष्य बाण अशी हत्यारे यांचा उल्लेख केला आहे. त्यानंतर १९५७ मध्ये पद्मश्री सन्मान प्राप्त कै. डॉ.वाकणकरांनी लावलेला मध्य प्रदेशातील भीमबेटका गुहांचा शोध तर खळबळ माजवणारा ठरला. २० चौरस किमी च्या परिसरात ७ टेकड्यांवर मिळून तब्बल ६०० हून अधिक शैलाश्रय सापडले आणि त्यांपैकी जवळजवळ ४०० गुहांमध्ये चित्रे मिळाली. आतापर्यंत आपल्या देशात अशी १५० ठिकाणे आणि त्यात १००० गुहांचा शोध लागला आहे. मध्य भारतात यांचे प्रमाण जास्त आहे. आश्चर्य म्हणजे विविध ठिकाणच्या या चित्रांमध्ये विलक्षण साधर्म्य आढळते. तशीच काड्यांची माणसे, तशीच नृत्याची नि शिकारीची दृश्ये! तसेच पळणारे प्राणी!


काय असतात ही चित्रे? का नि कशी काढली असतील? रंग कसे केले? कशाने रंगवली? पुन्हा प्रश्न ! पण आता त्यांची उत्तरे अभ्यासकांनी मिळवली आहेत.

बहुधा ही चित्रे म्हणजे प्राण्यांची शिकार, मासेमारी, छोट्या चकमकी, नृत्य, दैनंदिन जीवन असे प्रसंग असतात. आतापर्यंत ३०-३५ प्रकारचे प्राणी यातून दाखवले आहेत. गाय, बैल, कुत्रा, गवा, हरीण, सांबर, हत्ती, गेंडा, वाघ, चित्ता असे अनेक! प्राण्यांच्या चित्रात आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे गर्भार गाय व हरिणी दाखवताना पोटातले भाग दाखवले आहेत आरपार पाहिल्यासारखे. x ray style म्हणतात तसे.

पाल, विंचू, खेकडा, बेडूक, खार असे छोटे जीव सुद्धा आहेत . पक्ष्यांमध्ये मोर, शहामृग यांचा समावेश आहे. होय भारतात चक्क शहामृग होता पण काळाच्या ओघात इथून नामशेष झाला! (शहामृगाच्या अंड्याच्या कठीण कवचावर कोरीवकाम केलेले असे काही तुकडे भीमबेटकाला सापडलेत. महाराष्ट्रात पाटणे गावीही असे अवशेष मिळाले ज्यांचा काळ २५००० वर्षे पूर्व असा मानला जातो.)

तर या चित्रात सूर्य,चंद्र,चांदण्या,नद्या,डोंगर असेही असतात. मानवाकृती बहुधा काड्यांसारख्याच असतात. त्यातही स्त्री पुरुष वेगळे दाखवण्याची धडपड असते. निव्वळ रेषांचा वापर करून नृत्यातली गती, शिकारीतली आक्रमकता अप्रतिम रित्या व्यक्त होते. अन्न ,फळे गोळा करताना, पाट्यावर वाटताना, अशा स्त्रिया सुरेखरित्या दाखवल्या आहेत.

या चित्रांसाठी वापरलेले रंग बघता एकूण १६ छटा सापडल्या आहेत. पण प्रामुख्याने लाल, पांढरा आणि हिरवा हे तीन रंग दिसतात. गम्मत आहे हेच तीन रंग आपल्या ध्वजात सुद्धा आहेत!

आता लाल रंगासाठी काय वापरत होते तर चक्क गेरू! चुनखडीपासून पांढरा आणि हिरव्या गारेपासून हिरवा! दगडांची भुकटी पाण्यात, प्राण्यांच्या चरबीत किंवा हाडांच्या मगजात, अंड्याच्या पांढऱ्या बलकात कालवून वापरत असावेत. रंग साठवण्यासाठी कवटी, हाडांची नळी किंवा शहामृगाच्या अंड्याच्या टरफलाचा वाडगा!

रंगवायला कुंचला हवा- प्राण्यांच्या कातडीचे किंवा खारीच्या शेपटीचे केस झाडाच्या काटकीत खोचून तो बनवत. गुहेच्या अंधाऱ्या भागात चित्रे काढायची तर उजेड हवा- मग शेवाळ्याची वात नि चरबीचे तेल, की झाला दिवा!

या चित्रांवरून काय काय समजते?

तत्कालीन प्राणी,पक्षी, केशभूषा,वेशभूषा, चालीरीती, हत्यारे,अलंकार कितीतरी तपशील! पुरुषांचे गुडघ्यापर्यंत आखूड वस्त्र, कातड्याचे अंगरखे, तोंडावर प्राण्यांचे मुखवटे, डोक्यावर शिंगांचे शिरोभूषण, स्त्रियांच्या बांगड्या, गळ्यात दागिने अशा बऱ्याच गोष्टी कळतात. हत्यारे म्हणजे भाले, धनुष्य बाण, सुरे, काठ्या दिसतात प्रामुख्याने.

आता हे सगळं कशासाठी चितारलं असेल? बरेच अंदाज बांधले गेले आहेत. वेळ जात नाही म्हणून सहज किंवा गुहेचं घर सुशोभित करण्यासाठी असेल. आजही गोंड,वारली वगैरे आदिवासी घरांच्या भिंती अशा पद्धतीने रंगवताना बघतो आपण. कदाचित अशी चित्रे काढणे हा एखाद्या धार्मिक कृत्त्याचा भाग असेल. सुरुवातीच्या काळात जादू-टोणा किंवा यातु-विद्या ही धर्माची प्राथमिक अवस्था होती. जेम्स फ्रेझर ने Golden Bough नावाची १३ खंडांची एक ग्रंथ मालिका लिहिली. त्यात त्याने जगभरातल्या जमाती समाज यांच्या धार्मिक कल्पना गोळा करून लिहिल्या आहेत. त्यात जादू विषयक साम्य सिद्धांत त्याने मांडला आहे. आफ्रिकेत पुरुष शिकारीला गेले की स्त्रिया घरी खेळ खेळत. एकीला गवा वा डुकराची भूमिका देऊन इतर सर्व शिकारीचा अभिनय करत. खेळात ती पकडली गेली की तिकडे पुरुषांनाही उत्तम शिकार मिळणार ही समजूत! त्याच प्रकारे कदाचित अशी चित्रे काढली की शिकार मिळणार, दुभते प्राणी, शेतीला बैल मिळणार अशी समजूत असेल!

मला तर कधी असंही वाटतं की काही आपत्तीची चाहूल लागल्याने पुढे कुणाला तरी समजावं म्हणूनही चित्रे काढली असतील.. अजूनही या चित्रांचे गूढ पूर्णपणे उलगडलेले नाही.

मी ३८ वर्षांपूर्वी भीमबेटकाला गेले होते, चित्रे पाहिली सुद्धा; पण तेंव्हा त्यांचे महत्व तितकेसे माहीतच नव्हते मला! मध्ये बराच काळ लोटला. मग ६-७ वर्षांपूर्वी पंचमढीला बेगम महाल जवळच्या जंगलात अशीच चित्रे पाहायला मिळाली.पण ती बरीच खराब झालेली नि अस्पष्ट होती. मात्र एक छान संधी नुकतीच मला मिळाली.

झालं असं की मी टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचा भारतीय विद्या हा दोन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण केला. मग त्यात शिकलेली मंदिरे बघण्यासाठी हंपी बदामी ऐहोळे पट्टडकल असा दौरा केला. आता असं जायचं ठरवल्यावर त्या भागाविषयी वाचायला, माहिती गोळा करायला सुरुवात केली. तेंव्हा अनेगुंडी विषयी कळलं . हंपी पासून ५ किमी वर असलेले हे गाव रामायण काळात किष्किंधा नगरी म्हणून ओळखले जात होते. आजही इथे पम्पा सरोवर, अंजनेरी पर्वत आहेत. पुढे हरिहर बुक्क विजयनगर वसवण्यापूर्वी इथेच राहत होते. पण अनेगुंडीचा इतिहास फार प्राचीन आहे. महापाषाण युगीन दफने इथे बघायला मिळतात आणि साधारण त्याच आसपासची ही प्रस्तर चित्रे! अनेगुंडीची ही चित्रे त्या मानाने फारशी माहित नाहीत. खाजगी मालकीच्या जागेत आहेत. शेतातून चालत जाऊन मोठ्या पाषाणाच्या मागे अरुंद वाटेने गेल्यावर एक विस्तीर्ण सपाट जागा दिसते जी चारही बाजूंनी मोठमोठ्या पाषाणांनी वेढलेली आहे. तिथेच एका खडकावर गेरूने रंगवलेली काही चित्रे आहेत. मी यांविषयी आमच्या हंपीच्या मार्गदर्शकाला विचारल्यावर त्याला इतका आनंद झाला कि खुद्द हंपीतली अशी एक जागा त्याने उत्साहाने दाखवली! तिथे दलदल असल्याने जवळ जाऊन बघणे शक्य नव्हते म्हणून लांबूनच फोटो काढले. काही प्राणी नि मनुष्याकृती होत्या. फक्त लाल रंग वापरलेला होता.

अनेगुंडीच्या चित्रात मला थोडे वेगळेपण जाणवले. इथे शिकार,लढाईची दृश्ये नाहीत. मानवाकृती, प्राणी यातून दैनंदिन जीवन दाखवण्याचा प्रयत्न आहे. चौकोन,त्रिकोण यांद्वारे घरे दाखवली आहेत. चौकटीला रेलून किंवा घरात उभ्या मानवाकृती आहेत. गुहाचित्रात न दिसणारा साप मात्र इथे आहे. शिवाय एक मोठा फणाधारी नाग गुहेच्या छतावर आहे जो झोपूनच पाहावा लागतो.

सर्वात कोड्यात टाकणारी गोष्ट म्हणजे पाषाणाच्या पुढे आलेल्या भागाच्या छतावर आतल्या बाजूने रंगवलेली आकृती! एका वर्तुळात १२ छोटी दगडासारखी वर्तुळे ,एक मनुष्याकृती, त्रिकोण,नागमोडी रेषा आणि काही वस्तूंचे आकार... महापाषाण युगीन दफनांचे प्रतिनिधित्व करणारी ही आकृती आहे असे आधी मत होते. पण २०१० मध्ये भारतीय पुरातत्त्वाच्या अभ्यासकांनी इथे भेट दिली आणि टी. एम. केशवा व त्याचे सहकारी यांनी वेगळाच निष्कर्ष काढला. त्यांच्या मते हा प्रागैतिहासिक मानवाने काढलेला नकाशा आहे. समजा तिथल्या पाषाणांवरून चढून वर जाऊन खाली बघितले तर कसे दिसेल याचा नकाशा म्हणजे ते चित्र आहे असे त्यांचे मत आहे. कोणत्याही साधनांशिवाय निव्वळ डोळे आणि स्मरणशक्ती वापरून काढलेला हा नकाशा विलक्षणच म्हणावा लागेल. आजही नकाशात डोंगर त्रिकोणाने दाखवतो, तसेच त्यात दाखवले आहेत. अरुंद मार्गही दाखवला आहे! याच्या काळाविषयी इ.स.पू. १५०० ते इ.स.पू. १०००० वर्षे अशी विविध मते आहेत, नेमकी निश्चिती झालेली नाही.

खरे तर अशी चित्रे म्हणजे प्रत्येकाच्या कल्पना शक्तीला भरपूर वाव आहे! बघा फोटोतून तुम्हालाही सापडेल काही!! भीमबेटकाच्या चित्रांविषयी खूप अभ्यास झाला आहे आणि खूप माहिती उपलब्धही आहे. पण अजूनही अनेगुंडी सारख्या जागा आहेत अभ्यासकांना खुणावणाऱ्या! गरज आहे त्या जपण्याची, त्यांच्यापर्यंत पोचण्याची आणि त्यांचे गूढ उकलण्याची! डॉ. मीनाक्षी दुबे पाठक यांनी मध्य प्रदेशात आणि नुकतेच लडाख भागात या संदर्भात खूप काम केले आहे त्या करीत आहेत . अशाच अधिकाधिक संशोधकांची गरज आहे. तरच आपल्या प्राचीन संस्कृतीचं चित्र अधिकाधिक स्पष्ट होईल आणि आपला भव्य वारसा जगापुढे येईल.




Neelima thatte
डॉ. नीलिमा थत्ते या वैद्यकीय व्यावसायिक असून २५ वर्षे पिंपरी-चिंचवड येथे बालरोगतज्ज्ञ म्हणून कार्यरत होत्या. या वाटचालीत ज्या गोष्टी करावयाच्या राहून गेल्या असे वाटते त्या करण्यासाठी आणि सुगम संगीतासारखे स्वतःचे छंद जोपासण्यासाठी त्यांनी २०१२ मध्ये व्यवसाय निवृत्ती पत्करली. पक्षी विज्ञान,फुलपाखरे,छायाचित्रण,वनस्पती शास्त्र यांविषयी विविध अभ्यासक्रम त्यांनी पूर्ण केले आहेत. तसेच त्या संदर्भात मासिकांत आणि वर्तमानपत्रांत लेखनही केले आहे. लहान मुलांना पक्षी परिचय करून देणारी "कसा मी? असा मी" आणि एकटीने केलेल्या आसाम-अरुणाचल दौऱ्याविषयी "पूर्व अपूर्व" या दोन लेखमाला विशेष लोकप्रिय झाल्या. आकाश निरीक्षण आणि खग्रास सूर्यग्रहणाचे छायाचित्रण हे त्यांच्या आवडीचे विषय आहेत.

नुकताच त्यांनी टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचा "भारतीय विद्या-पारंगत" अभ्यासक्रम प्रथम क्रमांकाने पूर्ण केला. सध्या तिथेच "संस्कृत पारंगत" अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थिनी म्हणून शिक्षण घेत आहेत.




Wednesday, April 19, 2017

"प्राचीन भारतातील मंगल चिन्हे"

लेखिका: आरती कुलकर्णी


  प्राचीन संस्कृतींचा अभ्यास करत असताना अनेक विषयांचा व प्रवाहांचा विचार करणे क्रमप्राप्त ठरते. विविध धर्म कल्पना, त्यांचा विस्तार, जनमानस, सामाजिक तसेच राजकीय स्थित्यंतरे बघत असताना तत्कालीन साहित्य, कला यांमधून ते कसे व्यक्त होत असते, हे चिकित्सक दृष्टीने पाहणे हा एक भारावून टाकणारा अनुभव आहे.

  एकमेकांबरोबर समांतर चालणारे विचारप्रवाह, विशिष्ट धारणाशक्तीने प्रेरित होऊन विकसित होणार्‍या धर्मभावना, कधी त्यांचा एकत्रित, बरोबरीने होणारा प्रवास, तर कधी एकमेकांना छेद देणार्‍या कल्पना, काळानुरूप त्यांचे होणारे संक्रमण, हे सर्व तत्कालीन साहित्य तसेच कलेच्या माध्यमातून अभ्यासता येते.

  भारतीय संस्कृतीचा अभ्यास करताना प्रतीकांचा, मूर्तींचा अभ्यास करणे म्हणूनच गरजेचे होते आणि आहे. काळानुरूप होणारे मूर्तींमधील, प्रतीकांमधील बदल कित्येक गोष्टींची जाणीव करून देत असतात. प्रतीके का, कोठे, कशी वापरली गेली, त्यांचे असणे तसेच त्यांचे नसणे खूप काही सांगत असते. बदलांची जाणीव करून देत असते. काळानुसार देवतांमध्ये तसेच त्यांच्या अंकन पद्धतीत बदल होत असतात. वेगवेगळ्या संप्रदायांचा एकमेकांवरील प्रभाव, काही देवतांना गौण रूप प्राप्त होणे, काही देवता मोठ्या होणे इ. प्रकारही या अभ्यासातून दिसतात.

  नंतरच्या काळातील सांप्रदायिक चढाओढी, विलय, एकत्रीकरण, मैत्री, या प्रक्रियासुद्धा आपल्याला अशा प्रकारच्या अभ्यासातून स्पष्ट दिसू लागतात. परकीय देवांचा, कलांचा प्रभाव दिसतो आणि परंपरांच्या आधारे हळूहळू, परंतु निश्चीतपणे झालेली प्रक्रिया या सर्वांतून उलगडत जाते.

  सर्व प्राचीन संस्कृतींमध्ये प्रत्येक काळात मानवाने विविध प्रतीके वापरलेली दिसतात. ही प्रतीके म्हणजे धार्मिक तसेच सामाजिक जाणीवांचे प्रकटीकरण असते,असे म्हणता येईल. प्राचीन काळात मूर्तीपूजेच्या आधीदेखील विविध प्रतीके पूजनीय होती. त्याचप्रमाणे मंगलचिन्हे म्हणून देखीलअनेक प्रतीके निरनिराळ्या संकृतींमध्ये दिसत होती. त्यांची प्राचीनता मानवी इतिहासाइतकीच जुनी असावी.

  निरनिराळ्या प्राचीन उत्खनीत अवशेषांचा अभ्यास करताना असे दिसते, की काही विशिष्ट चिन्हे विशिष्ट कारणांसाठी वापरलेली आहेत. सिंधू संस्कृती अथवा जगातील इतर प्राचीन संस्कृतींच्या अवशेषांमध्ये आढळणार्‍या पुराव्यांवरून हे सहज लक्षात येते. यात सापडणारी मृद्-भांडी, चित्रकलेचे अवशेष, मुद्रा इत्यादी गोष्टींवरून असे दिसते, की काही आकार, चिन्हे यांचा विशिष्ट गोष्टींची प्रतीके म्हणून वापर होत होता. काही चिन्हांबरोबर शुभ – अशुभ असे विचार / भावना जोडण्यात आलेल्या दिसतात. काही काळानंतर मंगलमय प्रतीकांचा वापर, या प्रतीकांना प्राप्त झालेले धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व, यांवर अनेक विद्वानांनी संशोधन केले आहे.

  भारतात प्रतीकांचा वापर इतिहासपूर्वकाळापासून दिसून येतो. कलेची अभिव्यक्ती तसेच पूजनीय गोष्टी म्हणून, शोभा व सौंदर्य प्रतीत करण्यासाठी म्हणून अनेक विविध चिन्हे वापरलेली दिसतात. यापैकी काही चिन्हे काळाच्या ओघात धार्मिक अथवा मंगल प्रतीके म्हणून पुढे आलेली दिसतात.

  निरनिराळ्या सम्राटांचे राज्यविस्तार, धर्मांचा होणारा प्रसार,यांमधून विविध कल्पनांची देवाणघेवाण होत असे. कला, संस्कृती यांतूनअनेक चिन्हे व प्रतीके सर्वदूर वापरली गेल्याचे दिसून येते. भारतीय संस्कृतीचा, येथील धर्मांचा विस्तार राष्ट्रांच्या सीमा ओलांडून अनेक ठिकाणी झालेला दिसतो. अनेक संकल्पना व प्रतीकेसुद्धा भारताबरोबरच भारताबाहेरील अनेक देशांमध्ये आढळून येतात. याची ठळक उदाहरणे म्हणून स्वस्तिक व श्रीवत्स या चिन्हांकडे बघता येईल.

  यामध्ये कालानुरूप अनेक बदल झालेले दिसून येतात. प्रतीकांचे अर्थ, व्यक्त करण्याची पद्धत, महत्त्व आदी सर्व गोष्टींमध्ये फरक पडलेला दिसतो.काही प्रतीके काळाच्याओघात नष्ट झालेली दिसतात, नवीन चिन्हे उदयाला आलेली दिसतात तसेच काही प्रतीके टिकून राहिली,तरी त्यांचे संदर्भ बदलत जाताना दिसतात.

  प्राचीन भारतीय प्रतीकांच्या बाबतीत विचार करत असताना वेगवेगळ्या याद्या अथवा उल्लेख सापडतात.

  अष्ट-मंगल ही कल्पना खूप पूर्वीपासून समाजात लोकप्रिय असलेली दिसते.अष्ट-मंगल म्हणजे मंगलकारक आठ वस्तूंचा समुदाय. ही कल्पना वैदिक नसून थोडी नंतरच्या काळातील आहे.

  पौराणिक अष्टमंगलांमध्ये गाय, ब्राह्मण, अग्नी, सोने, तूप, सूर्य, जल व राजा यांचा समावेश होत असे. प्राचीन साहित्यामध्ये यांचे निरनिराळे संदर्भ सापडतात. सिंह, वृषभ, हत्ती, पूर्णकुंभ, पंखा, माला, भेरी व दीपअशीही अष्टमंगले सापडतात. साधारणत: सर्वांना मान्यअसलेली व भारतभर आढळणारी अष्टमंगल  प्रतीके म्हणजे, मीन-मिथुन, देव-विमानगृह, श्रीवत्स, वर्धमान, त्रिरत्न, पुष्पदाम, इंद्रयष्टी किंवा वैजयंतीआणि पूर्णकलश.

  काही लिखित संदर्भांवरून असे समजते, की पृथ्वी जिंकायला निघालेले राजे, तसेच सेनापती, मंगल होण्याच्या इच्छेने अष्टमंगलमाला धारण करीत असत.

अष्टमंगल माला, सांची तोरण 

  इ. पू. २ / ३ र्‍या शतकापासून या प्रतिकांचे अंकन सांची, भारुथ, अमरावती येथील स्तूपांवर, उदयगिरी सारख्या ठिकाणी असलेल्या लेखांत, तसेच इतरही अनेक कलाप्रकारांत दिसू लागते.याचाच अर्थ या काळापर्यंत मंगलचिन्हे समाजात खूप खोलवर रुजलेली होती. त्यांचा वापर सुद्धा समाजाच्या सर्व वर्गांत धार्मिक व सांस्कृतिक कार्ये व कला यांतून होत होता.

  या सर्व मंगल चिन्हांबद्दल इतके बोलल्यावर आता त्यापैकी प्रमुख मंगल चिन्हांचा अर्थ व त्यामागची कल्पना बघू.

स्वस्तिक: हे सर्वदूर प्रसिद्ध असलेले मांगल्याचे प्रतीक आहे. हे चिन्ह प्राचीन काळापासून वैभव, संपन्नता, प्रगती आणि विजयाचे प्रतीक समजले जाते.

श्रीवत्स: संपत्ती, सुबत्ता, ऐश्वर्य यांची स्वामिनी असलेल्या लक्ष्मीचे प्रिय (बाळ) अशी श्रीवत्स या शब्दाची फोड करता येते.

श्रीवत्स हे प्रामुख्याने लक्ष्मीचे प्रतीक मानले गेले आहे. सुख व समुद्धीसाठी ते प्राचीन काळापासून पूजनीय मानले गेले आहे. याचमुळे हे मांगल्याचे प्रतीक प्राचीन भारतीय कलेचा महत्वाचा भाग असल्याचे दिसते. ऐहिक जगात अर्थातच सर्वसामान्य लोकांना धन, संपत्ती व त्यातून येणारी सुबत्ता हवी असते. यामुळेच त्याचे प्रतीक असणारे श्रीवत्स जनमानसात खूप लोकप्रिय, तसेच पूजनीय राहिलेले दिसते.

श्रीवत्स चिन्हाला खूप मोठा इतिहास आहे.तीन हजारांपेक्षा जास्त वर्षांची परंपरा लाभलेले हे चिन्ह सर्व प्राचीन भारतीय धर्मांत म्हणजेच वैदिक, जैन व बौद्ध धर्मांत वापरलेले दिसते. हेच स्वस्तिक चिन्हाबाबतही म्हणता येते.

शंख: शंखातून शुद्ध, सात्वीक असा धर्मनाद ऐकू येतो व त्यामुळे अजाणतेपणातून जाग येते अशी कल्पना केलेली आहे. शंख हे हिन्दु धर्मात विष्णूच्या हातातील महत्वाचे आयुध म्हणून सर्वत्र दिसते.

मीनद्वय: मीन युगुल हे निर्मितीचे, सुखाचे प्रतीक म्हणून सर्वत्र वापरलेले दिसते.

पद्म: कमळ हे शुद्धता, सुचिता यांचे प्रतीक समजले जाते. अज्ञान, दुर्गुण यांना मागे सारून, खाली ठेवून त्यांच्या चिखलातून पवित्र असे कमळ वर येते. या कल्पनेमूळेच अनेक देवता या पवित्र कमलासनावर बसलेल्या दिसतात.

छ्त्र: हे राजसत्ता व त्यामूळे येणारे अधिकार यांचे प्रतीक म्हणून बघितले जाते. एखादा सम्राट अथवा धर्म सर्वांना आपल्या छ्त्रछायेखाली घेतो व सर्व दुःखांपासून संरक्षीत करतो ही अतीशय महत्वाची कल्पना छ्त्र दाखवून प्रतीकत्मक पद्धतीने दर्शविली जाते.

  याचप्रमाणे भेरी, ध्वज, पताका इ. चिन्हे युद्ध, त्यातील विजय, त्यानंतरचा आनंद व उत्सव यासंबधातील आहेत.

  घट, कुंभ हे मंगल चिन्ह अनेक अर्थाने महत्वाचे मानले जाते. जलाने भरलेला कुंभ हा जणू अमृतघटाचेच प्रतिनिधीत्व करतो. सर्व पवित्र व वैभवशाली गोष्टींचा संग्रह कुंभात होतो आणि त्यामुळेच तो मंगल व पूजनीय ठरतो. घट हे स्त्रीच्या गर्भाशयाचे प्रतीक मानले जाते त्यामुळे ते सर्जनाचे व सुफलतेचे सुद्धा महत्वाचे प्रतीक आहे. नवरात्रात यामुळेच घटस्थापनेला व त्याच्या पूजेला खूप महत्व असते.

  ही प्राचीन चिन्हे व प्रतिके कुठे कुठे दिसतात व अभ्यासता येतात ? याचे उत्तर अगदीच सोपे आहे. प्राचीन साहित्यात यांचे भरपूर संदर्भ मिळतात. त्याचप्रमाणे, अनेक प्रकारच्या प्राचीन भौतिक साधनांमध्ये, कला अवशेषांमध्ये ही चिन्हे सापडतात.

* मृद्-भांडी
* प्रस्तर शिल्पे
* मूर्ती
* चित्रे
* लेख
* नाणी
* मुद्रा
* स्थापत्य

  हाथीगुंफा येथील प्रसिद्ध असलेल्या खारवेल राजाच्या लेखात सुरुवातीलाच श्रीवत्स व स्वस्तिक ही शुभ चिन्हे कोरलेली दिसतात.सर्व लेखांची, महत्वाच्या लेखनाची सुरुवात ’स्वस्तिश्री’ या मंगलाने करण्याची प्रथा अगदी अलिकडील काळापर्यन्त चालू असलेली दिसते.

खारवेल लेख, हाथीगुंफा, इ. स. पूर्व २ रे शतक 

  प्राचीन काळातील नाण्यांवरसुद्धा अनेक शुभ-चिन्हे उमटविलेली असत. कुणिन्द राजा अमोघभुती याच्या चांदीच्या या नाण्यावर स्वस्तिक, श्रीवत्स, वेदिका-वृक्ष, नंदीपाद, इ. चिन्हांचे सुंदर अंकन दिसते.

कुणिन्द, अमोघभूती

  जैन कलेत, मथुरा कलाशैलीत, मूर्तींच्या आधीपासून आयागपट्ट खूप प्रमाणात तयार होत होते. कंकाली-टिला व मथुरेच्या आसपासच्या ठिकाणांहून अनेक आयागपट्ट मिळालेले आहेत.

  साधारणतः जैन तीर्थंकर मध्यभागी, बाजूने मंगलचिन्हे तसेच खालील बाजूस दानलेख असे याचे स्वरूप असते. यांमधे अष्टमंगल चिन्हे अतिशय सुंदररित्या दाखविलेली असतात.

आयागपट्ट, मथुरा, कुशाण काळ

  जैन, बौद्ध व हिंदू या तीनही धर्मांनी काही मंगलचिन्हे आपलीशी केल्याचे दिसते. त्या चिन्हांना विशिष्ट प्रतीकांसाठी योजलेले दिसते. सार्वभौम असणे, संपत्ती, समृद्धी, आरोग्य, विजय या गोष्टी सर्वच धर्मांतील लोकांना हव्याशा वाटणार्‍या आहेत. म्हणूनच श्रीवत्स, स्वस्तिक अशी चिन्हे धर्माच्या चौकटी मोडून सर्वांनाच प्रिय व पूजनीय होत्या.

  नंतरचा काळ पाहता प्रतीकांकडून मूर्ती पूजेकडे वळणे क्रमप्राप्त व नैसर्गिक होते, असे दिसते. प्रतीकांमध्ये उपास्य देवतेला बघणे याचीच पुढची पायरी म्हणजे मानवी रूपात इच्छीत देवाला आणणे व त्याचे सर्व गुण, आयुधे, शक्ती इ. मूर्त स्वरूपात मांडणे. अर्थात, काही मंगल व पूज्य चिन्हांवरून, प्रतीकांवरून पुढील काळातील काही देवतांच्या मूर्ती तयार झाल्या असाव्यात, उदा. अभिषेकलक्ष्मी.

  असे असले तरीही या चिन्हांमागे असलेल्या भावना अजूनही समाजमानसात रुजलेल्या आहेत, ताज्या आहेत. निरनिराळी तोरणे, पूजा साधने, चैत्रांगणासारख्या पारंपारिक रांगोळ्या इ. च्या रूपाने ही मंगल चिन्हे भारतीय समाजाचा आजही अविभाज्य भाग बनून राहिलेली दिसतात.




Arati Kulkarni

आरती कुलकर्णी यांनी माहिती व तंत्रज्ञान विषयातील पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. सुमारे अठरा वर्षांपासून त्या संगणक क्षेत्रात कार्यरत आहेत. गेली काही वर्षे त्या प्राचीन भारतासंबधी अनेक विषयांचा अभ्यास करीत आहेत. अलिकडेच त्यांनी भारतीयविद्येचा पारंगत अभ्यासक्रम विशेष प्राविण्यासह पूर्ण केला आहे.
मूर्तीशास्त्र, प्राचीन भारतीय कला तसेच स्थापत्य, नाणकशास्त्र, परंपरा व प्रतीके या विषयांच्या अभ्यासामधे त्यांना विशेष रुची असून या विषयांवरील त्यांचे काही लेख व शोध निबंध प्रकाशीत झाले आहेत. त्यांनी श्रीवत्स या मंगलचिन्हावर आधारीत संशोधन प्रकल्प केला आहे.

Monday, April 17, 2017

"जागतिक वारसा"

लेखक: आनंद कानिटकर 

"जागतिक वारसा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा"

  दुसऱ्या महायुद्धानंतर युरोपमध्ये झालेल्या अपरिमित हानीत एक महत्वाची हानी होती सांस्कृतिक वारशाची. यातूनच १९४५ मध्ये युनेस्कोची (United Nations Educational, Scientific, Cultural Organization) निर्मिती झाली. पुढील काही दशकांमध्ये युनेस्कोने जागतिक स्तरावर सांस्कृतिक क्षेत्रात भरीव कामगिरी केली. यानंतर युनेस्कोने महत्वाचा सांकृतिक आणि नैसर्गिक वारसा हा एखाद्या देशाचा नसून आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याच्या संरक्षणाची गरज आहे हे जाणून एक नवीन पाउल उचलले आणि त्यामधून १९७२ मध्ये अस्तित्वात आला ‘जागतिक सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारसा संरक्षण करार’. यालाच आपण सोप्या भाषेत ‘जागतिक वारसा करार’ म्हणून ओळखतो. याअंतर्गत विविध देशांतील सांकृतिक व नैसर्गिक जागतिक वारसा स्थळांची यादी केली जाते. वर उल्लेख केलेल्या जागतिक वारसा करारावर जे देश सही करतात, फक्त तेच देश आपल्याकडील सांस्कृतिक व नैसर्गिक वारसा स्थळांचा या जागतिक वारसा यादीत समावेश होण्यासाठी नामांकने पाठवू शकतात.
  १९७८ मध्ये पहिल्यांदा जागतिक वारसा यादीत वारसा स्थळांची नोंद होण्यास सुरुवात झाली. आतापर्यंत युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत १६५ देशातील १०५२ वारसा स्थळांचा समावेश करण्यात आलेला असून ही यादी दरवर्षी वाढतच आहे. जागतिक वारसा स्थळांमध्ये सांस्कृतिक, नैसर्गिक, मिश्र (सांस्कृतिक व नैसर्गिक) व कल्चरल लँडस्केप अशा विविध स्थळांचा समावेश होतो. याअन्तर्गत जागतिक वारसा यादीत अनेक राष्ट्रिय उद्याने, पर्वतराजी, तलाव, बेटं अशा नैसर्गिक स्थळांबरोबर गुहा, किल्ले, लेण्या, इमारती, पूल, शहर, गावं, मनोरे, देऊळे, मशिदी, चर्चेस, ऐतिहासिक वास्तू अश्या सांस्कृतिक वारसा स्थळांचाही समावेश करण्यात आला आहे. अर्थात जगातील सर्व देशातील सर्व वारसा स्थळांचा या यादीत समवेश करणे अपेक्षित नसून ही यादी प्रातिनिधिक स्वरुपाची आहे. ज्या वारसा स्थळांचे महत्व व मूल्य त्या देशाच्या सीमा ओलांडून वैश्विक मूल्य प्रस्थापित करते म्हणजेच त्या वारसा स्थळाचे महत्व एखाद्या देशाच्या इतिहासासाठी महत्वाचे न राहते ते संपूर्ण मानवजातीच्या वारशासाठी महत्वाचे आहे अशा वारसा स्थळांचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ यादीत करण्यात येतो. परंतु हे वैश्विक मूल्य नामांकनाच्या फाइल मधून पटवून द्यावे लागते आणि त्यासाठीचे सर्व पुरावे द्यावे लागतात.
  अर्थातच या सर्व मानांकन प्रक्रीयेसाठीची नियमावलीही युनेस्कोने तयार केली आहे व त्यात अनेकदा सुधारणा केली जाते. जागतिक वारसा मानांकन हे एखाद्या इमारत,शहर, वारसास्थळांना मिळते ते त्याच्या वैश्विक स्थापत्य, भौगोलिक, नैसर्गिक मुल्यांवर. त्याच्याशी संबधित एखाद्या माणसाचा इतिहास किंवा त्याचे सांस्कृतिक मूल्य हा या निकषांचा एक भाग होऊ शकतो पण त्या इतिहासाचा भौतिक पुरावा असावा लागतो. हा पुरावा म्हणजे ती इमारत, स्थल, परिसर अथवा ते शहर असावे लगते. उदाहरणार्थ एखाद्या पुरातत्वीय स्थळाचे उत्खनन करताना सांस्कृतिक मूल्य असलेल्या अनेक वस्तू, मूर्ती सापडू शकतात, ज्या नंतर एखाद्या संग्रहालयात ठेवल्या जातील. परंतु ते पुरातत्वीय स्थळ जागतिक वारसा म्हणून नामांकित करताना प्रत्यक्ष त्या स्थळावर जे शिल्लक अवशेष मिळाले असतील त्या अवशेषांचे नामांकन या जागतिक वारसा यादीसाठी केले जाते. तिथे उत्खननात सापडलेल्या आणि नंतर संग्रहालयात ठेवलेल्या भौतिक वस्तूंकरता जागतिक वारसा यादीत नामांकन मिळू शकत नाही. तसेच वारसा स्थळाशी संबंधीत घडलेल्या घटना अथवा त्याचे समाजातील सांस्कृतिक मूल्य याच एका निकषाच्या आधारे जागतिक वारसा नामांकन मिळत नाही त्यासाठी इतर निकषांवरही ते वारसास्थळ खरे उतरावे लागते.      जागतिक वारसा नामांकनासाठी ही वारसास्थळे जागतिक वारसा केंद्र, युनेस्को, परिस यांना फक्त देशातील केंद्र सरकारच पाठवू शकते, इतर कोणतीही संस्था अथवा राज्य सरकार ही नामांकनाची फाइल पाठवू शकत नाही.
देशातील जी वारसा स्थळे, जागतिक वारसा स्थळयादीमध्ये समाविष्ट करण्यासाठी सादर करायची असतात ती आधी युनेस्कोच्या संभाव्य यादीत (Tentative List) असणे अनिवार्य असते. या संभाव्य यादीत वारसा स्थळाचा समावेश होण्यासाठी वेगळी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय प्रक्रिया असून त्यातही ६ ते १२ महिने जाऊ शकतात. या संभाव्य यादीत समावेश होण्यासाठी वारसास्थळाच्या सीमा, त्याचे जागतिक वारसा स्थळ बनण्यासाठीचे वैश्विक मूल्य, त्यासाठीचे संभाव्य निकष,त्यासारखी इतर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय वारसास्थळे यांचे तपशील द्यावे लागतात. हे तपशीलच पुढील मुख्य मानांकनाच्या फाईलचा पाया ठरतात.
  मुख्य मानांकन फाईल जी इंग्लिश अथवा फ्रेंच भाषेतून तयार करावी लागते, ती शेकडो तसेच हजारो पानांची असू शकते. त्यात मुख्यतः वारसा स्थळांची सीमा, त्यांचा टोपोग्राफीक नकाशा, त्यांची मालकी, संरक्षण, संरक्षण कायदे याबरोबरच वारसा स्थळाचे वर्णन, इतिहास आणि विकास सांगताना त्यात झालेले बदलही (तोडफोड,पुनर्बांधणी, जतन, संवर्धन, अतिरिक्त बांधकाम, इ.) नमूद करावे लागतात. आपण सादर करणार असलेल्या वारसास्थळाचे, जागतिक वारसा यादीत समावेश होण्यासाठी असलेले वैश्विक मुल्य कोणते, तसेच त्यासाठी कोणते निकष लागू पडतात याची विस्तारपूर्वक आणि विचारपूर्वक मांडणी करावी लागते. नुसतेच आपण नामांकन करीत असलेले वारसा स्थळ अद्वितीय आहे व त्याची इतर कुठल्याच वारसास्थळाबरोबर तुलना होऊ शकणार नाही असे म्हणता येत नाही. त्याचप्रमाणे एखादे वारसास्थळ एखाद्या प्रदेशाकरता किंवा देशाकरता मौल्यवान असेल, परंतु ते आंतरराष्ट्रीय स्तरावर कसे महत्वाचे आहे, हे जर युनेस्कोच्या समितीला पटवून देता आले नाही, तर आपण सादर केलेले नामांकन नाकारले जाऊ शकते. यासाठीच आपल्या वारसा स्थळाचे तौलनिक विश्लेषण करुन दाखवावे लागत. यात केवळ त्याच देशात असलेल्या तत्सम वारसास्थळांबरोबर तुलना करून भागत नाही तर इतर देशामध्ये असलेल्या तद्सदृश्य वारसास्थळांबरोबरही त्याची तुलना करून, आपण सादर करीत असलेल्या वारसा स्थळांचे वैशिष्ट्य आणि वैश्विक मूल्य सिद्ध करावे लागते.
  याशिवाय या वारसा स्थळाची सत्यता व त्याचे अखंडत्व याचे तपशीलवार वर्णन करावे लागते. वैश्विक मूल्य, वारसा स्थळाची सत्यता, अखंडता, त्याचे जतन, संवर्धन इत्यादी विषयांवर १९७८ च्या आधीपासूनच अनेक आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांनी अभ्यास आणि संशोधन करून आपले विचार मांडले आहेत. त्यातील कोणती विचारधारा आपण नामांकनासाठी सादर करीत असलेल्या वारसास्थळासाठी योग्य आहे हेही तपासून पाहावे लागते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरु असलेल्या जागतिक वारसा ह्या क्षेत्रात सुरु असलेल्या नवीन घडामोडींची आणि वैचारिक उहापोहाची माहितीही असावी लागते.
  या सर्वांबरोबरच या वारसा स्थळांचे संरक्षण व व्यवस्थापन तसेच भविष्यात या वारसा स्थळाचे वैश्विक मुल्य अबाधित राखण्यासाठी करावे लागणारे प्रयत्न विस्ताराने नमूद करावे लागतात. तसेच त्या वारसा स्थळाची व्यवस्थापन योजना (management plan) तयार करावी लागते. त्या वारसा स्थळाची सध्याची संवर्धनाची स्थिती तसेच त्या वारसा स्थळावर परिणाम करणारे घटक यांची विस्तृत माहिती द्यावी लागते. इतिहास, ऐतिहासिक अवशेष याबरोबरच वर नमूद केलेल्या माहितीचा सर्वंकष विचार करूनच युनेस्कोने नेमलेले आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ नामांकन झालेल्या वारसास्थळाबद्दल आपली मते नोंदवतात.
  वरील सर्व माहितीचा विचार केल्यास नामांकनाची फाईल सादर करण्यापूर्वी ती तयार करणे, त्या वारसा स्थळाचे जतन, संवर्धन व संरक्षण करणे, त्याची व्यवस्थापन योजना बनवणे ही देशांतर्गत प्रक्रिया ३ ते ८ वर्षाची असू शकते. अहमदाबाद किंवा दिल्ली ही शहरे जागतिक वारसा नामांकनासाठी सादर करण्याची योजना आहे. परंतु त्याची नामांकनाची फाईल तयार करण्याची प्रक्रिया गेली अनेक वर्षे सुरु होती तर त्या शहरांतील विविध भागांच्या संवर्धनाची प्रक्रिया अनेक दशकं सुरु आहे. 
  ही तयार झालेली मानांकनाची फाईल देशाचे केंद्र सरकार युनेस्कोकडे पाठवते. त्यानंतर त्यावर अनेक आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांकडून अहवाल मागवले जातात. त्यांच्या मतानुसार त्या देशाकडून अजून माहिती अथवा स्पष्टीकरण मागवले जाते. त्यानंतर युनेस्कोने पाठवलेले आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ ह्या वारसास्थळांना अधिकृत भेटी देतात व आपला अहवाल देतात. हे सर्व अहवाल एकत्र करून युनेस्को त्यांचा अंतिम निर्णय घेते.दरवर्षी होणाऱ्या जागतिक वारसा समितीच्या बैठकीत या निर्णयाला अधिकृत मान्यता मिळते. जागतिक वारसा नामांकनाची आंतरराष्ट्रीय प्रक्रिया दीड वर्षाची असते. म्हणजे फेब्रुवारी २०१६ मध्ये एखाद्या देशाने अधिकृतरित्या युनेस्कोकडे सादर केलेले वारसा स्थळ विविध मान्यता मिळवत, काहीही अडथळा आला नाही तर जुलै २०१७ मध्ये अधिकृतरित्या जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित होऊ शकते. उदा. फेब्रुवारी २०१५ मध्ये जागतिक वारसा केंद्राकडे पाठवण्यात आलेल्या कांचनगंगा राष्ट्रीय उद्यानाच्या मानांकनाला जुलै २०१६ मध्ये जागतिक वारसा समितीच्या बैठकीत अधिकृतरित्या जागतिक वारशाचा दर्जा देण्यात आला. कुठलाही अडथळा न येता जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता मिळणारे हे गेल्या दोन दशकातील भारतातील पहिलेच वारसा स्थळ ठरले आहे.
  जागतिक वारसा यादीत नामांकन मिळणे हे विविध देशांसाठी विविध पद्धतीने महत्वाचे असते. मुख्यतः ती प्रत्येक देशासाठी अभिमानाची बाब असतेच परंतु त्याबरोबरच पर्यटनाला चालना मिळवून देणारी असते. अनेक आंतररराष्ट्रीय पर्यटक जागतिक वारसा यादीतील स्थळांना भेटी देणे पसंत करतात. कास पठार व रानी की बाव येथे जागतिक वारसा मानांकन मिळाल्यानंतर वाढलेल्या पर्यटनावरून ही बाब स्पष्ट होते. इटली व स्पेन हे देश दरवर्षी जागतिक वारसा मानांकनासाठी वारसा स्थळे सादर करत असतात व त्यातून त्यांच्या वारसा स्थळाच्या पर्यटनातही वाढ होत आहे. अर्थात या पर्यटनाचे दुष्परिणाम वारसा स्थळांवर होणार नाहीत व पर्यटनास अनुकूल यंत्रणा या वारसा स्थळांच्या आजूबाजूस उभारली जाइल याची काळजी हे देश घेत असतात. अर्थात एकदा जागतिक वारसा नामांकन मिळाले, की त्या देशाची जबाबदारी संपली असे होत नाही. त्या वारसा स्थळाची देखरेख, संवर्धन, तेथील पर्यटन या सर्वांचे अहवाल युनेस्कोला द्यावे लागतात. अफगाणिस्तानात जागतिक वारसा स्थळांवर काम करताना सतत या संदर्भातील आंतरराष्ट्रीय मानकांचा विचार करूनच कामाची आखणी करावी लागे. व दरवर्षी या कामाचे अहवाल युनेस्कोच्या पॅरीस येथील कार्यालयात पाठवावे लागत.
  वरील माहिती प्रत्यक्ष मानांकन प्रक्रियेच्या हिमनगाच्या टोकाचाही भाग नाही तर केवळ दर्शन आहे. अशी ही फाईल तयार करण्यासाठी इतिहासकार, संवर्धन स्थपती,सरकारी अधिकारी, इंग्लिशचे उत्तम ज्ञान असणारी व्यक्ती, वारसा व्यवास्थापक, जागतिक वारसा प्रक्रियेचे ज्ञान असणारी व्यक्ती अशा अनेकांचा समावेश करावा लागतो. युनेस्कोच्या जागतिक धोरणाचा आणि बदलत्या प्रवाहांचा माग ठेवून आपले जागतिक वारसास्थळाचे नामांकन पूर्ण करावे लागते, इतकेच नाही तर त्याच्याशी संबंधित सर्व बाबींची पूर्तता त्यानंतरही करावी लागते. या बाबींची पूर्तता न केल्याने युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीतून आपल्या स्थळांची नावे कमी होण्याची नामुष्की दोन देशांना पत्करावी लागली आहे.
  जागतिक वारसा यादीमध्ये आपल्या देशातील स्थळांचे नाव येणे ही नक्कीच अभिमानास्पद बाब असते, परंतु त्याचबरोबर येणारी जबाबदारीही पेलण्याची त्या देशातील, त्या प्रदेशातील यंत्रणेची तयारी असावी लागते.

( भारतातील जागतिक वारसा स्थळांविषयी पुढील भागात जाणून घेऊया...)



Anand Kanitkar 
आनंद कानिटकर हे आंतरराष्ट्रीय स्तरावर वारसा सल्लागार म्हणून गेली काही वर्षे कार्यरत आहेत. त्यांनी फ्रांस, जर्मनी व इटली येथील विद्यापीठांतून कल्चरल लँडस्केप: संवर्धन आणि व्यवस्थापन या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी जागतिक वारसा केंद्र; युनेस्को पॅरिस येथे जागतिक वारसा नामांकनाच्या विभागात काम केले आहे. त्यादरम्यान इतर देशातील फाईल्स सोबतच रानी की बाव, (गुजरात) आणि कांचनगंगा राष्ट्रीय उद्यान (सिक्कीम) ह्या वारसा स्थळांच्या जागतिक वारसा नामांकनांची तांत्रिक पूर्णता तपासणी केली होती. त्यानंतर २०१३ मध्ये त्यांनी सिक्कीम सरकारसाठी कांचनगंगा राष्ट्रीय उद्यानाच्या जागतिक वारसा मानांकन प्रक्रियेसाठी सल्लागार म्हणून काम करताना त्या फाइलचे पुनर्लेखन केले होते. कांचनगंगा राष्ट्रीय उद्यान हे जागतिक वारसा मानांकनासाठी भारतातून पाठवले जाणारे पहिलेच मिश्र वारसा स्थळ (सांस्कृतिक व नैसर्गिक वारसा स्थळ) व कल्चरल लँडस्केप होते, ज्याला जुलै २०१६ मध्ये जागतिक वारसा यादीत स्थान प्राप्त झाले. २०१४-१५ मध्ये आनंद कानिटकर यांनी अफगाणिस्तानातील हेरात व जागतिक वारसा स्थळ असलेल्या बामियान येथील तेराव्या शतकातील किल्ल्याच्या संवर्धनाच्या प्रकल्पांसाठी युनेस्कोच्या काबुल कार्यालयात प्रकल्प व्यवस्थापक म्हणून काम केले आहे. सध्या ते आंतरराष्ट्रीय स्तरावर वारसा सल्लागार तसेच अभ्यासक म्हणून स्वतंत्ररित्या काम करत आहेत.