ऐतिहासिक चरित्रे: भाग १ - संत ज्ञानेश्वर
लेखक: डॉ. राहुल देशपांडे
अनेक वेळा लोकोत्तर महात्म्यांचे आयुष्य देवत्त्वाच्या वलयामुळे कायमच गूढ धुक्यात गुरफटून राहते आणि कापुरासारखे तेजाने झळाळून जाताना काही क्षण आसमंत सात्विक प्रकाशाने उजळवून स्वत:च आसमंतात विलीन होऊन जाते. समुद्राकाठच्या वाळूप्रमाणे काही बोचरे ओरखडे हातावर ठेवून अलगद निसटून जाणारे क्षण आणि या लोकोत्तर महात्म्यांच्या सर्वार्थी दर्शनाच्या आधी ब्रह्मांडात विरून गेलेल्या अभंगांच्या संवेदना अशाच काहीशा हुरहुर लावणा-या भावना पेरून जातात. आपल्या भाबड्या जाणिवांमुळे आणि संवेदनांवर साचलेल्या जाचक रूढी परंपरांच्या पांढरामुळे अनेक महात्मे त्या गूढ कथेतील नायक म्हणूनच जनमानसाच्या विचारांमध्ये उरतात तर काही पौराणिक कथांशी नाळ जोडत अवतार म्हणून देवघरात सजतात.
संत ज्ञानेश्वर समजून घेण्यासाठी प्रथम ढोबळपणे तरी ज्ञानेश्वरपूर्व काळात काही क्षण मनापासून हरवून जाणे महत्त्वाचे आहे. तो काळ महाराष्ट्रासाठीही खूप महत्त्वाचा आहे. चालुक्य – राष्ट्रकूट राजवटीत महाराष्ट्र घडत होता, सजत होता. देवगिरीच्या यादावांमुळे संपूर्ण महाराष्ट्र राजकीय स्थैर्य उपभोगत होता. राजकीय स्थैर्याबरोबर ओघाने येणा-या असंख्य समांतर विषय आणि घटकांमध्ये तत्कालीन प्रदेश समृध्द होत होता. मात्र हे असतानाही साधारण नवव्या-दहाव्या शतकात धार्मिक जगतात खूप मोठे बदल घडत होते. वैदिक, बौध्द आणि जैन या तीनही तत्कालीन प्रमुख धर्मांमध्ये तांत्रिक वाममार्गाचा शिरकाव झाला होता. सर्वच पंथात आणि सर्व स्तरांवर सामाजिक जाणिवाही बदलत होत्या. मास, मद्य, मैथुन या तोपर्यंत रूढी आणि धर्मबाह्य असणा-या घटकांना अनेक विद्वानांनी नियमात बसवून तत्कालीन पंथात सामावून घेतले होते. प्रत्येक धर्मात सिध्द तयार होत होते. जैन सिद्ध, बौध्द सिध्द, नाथ सिध्द असे अनेक उपपंथ तयार होत होते. श्री शैल पर्वत या सर्व साधनामार्गातील महत्त्वाचा दुवा ठरत होता. कालामुख, कापालिक, शाक्त, नाथ, महानुभाव अशा विविध उपपंथांनी समाजात आपले स्थान बसविले होते. शंकराचार्यांनी जनमानसात प्रसिद्ध केलेली पंचायतन पूजा, हरिहराच्या आढळून येणा-या मूर्ती अशा विविध घटकांनी तत्कालीन समाजातील अनेक उपपंथांना एकत्रित बांधून ठेवण्यासाठी निर्मिलेल्या या धार्मिक संकल्पना मन थक्क करतात. मात्र या संकल्पना समाजात रूजत असतानाच सर्व धर्मात झालेला हा वाममार्गाचा प्रसार अनेक कोडी घालणारा आहे.
मात्र धार्मिक संकल्पनांच्या या जंगलात हरवून जात असताना शैवमतवादी बसवेश्वर आणि आल्लम प्रभू यांनी रुजवलेला वीरशैव पंथ आणि तांत्रिक मार्ग बाजूला सारून गोरक्ष नाथांनी नव्याने घडविलेला नाथ पंथ सामाजिक - धार्मिक संवेदनांसाठी खूप महत्त्वाचे ठरतात. म्हणूनच वर्णाश्रम व्यवस्था हिच समाजाची संपूर्णपणे ओळख असताना, राजकीय स्थैर्य असूनही धार्मिक संकल्पना आणि त्यामुळे संपूर्ण सामाजिक मानसिकता तांत्रिक वाममार्गाच्या भोव-यात सापडलेली असताना भक्ती मार्गाला समाजाचा श्वास बनवून, नाथ पंथाला नवीन ओळख देत सर्व समाजाला एकसंघ बांधून ठेवणा-या ज्ञानेश्वरांचे अस्तित्व तत्कालीन समाजासाठी किती महत्वाचे होते हे जाणवते. त्यांचे तत्कालीन अस्तित्व केवळ प्रेरणादायक नसून नक्कीच सात्विक दिशादर्शक होते यात शंका नाही. ज्ञानेश्वर आणि त्यांच्याशी संबंधित घटकांचा विचार करताना या काळाचा असा ढोबळ विचार जरी केला तरी ज्ञानेश्वरांचे महत्त्व कळण्यास, त्यांच्या विचारांचा धागा शोधण्यास आणि त्यांच्या काव्यातील साहित्याच्या लाटांखाली खोल लपलेले तत्वज्ञान समजण्यास मदत होऊ शकेल आणि या सर्वांचा विचार करता ज्ञानेश्वर हे केवळ कवी किंवा तत्त्वज्ञ न राहता समाजाला दिशा देणारे अध्यात्मिक जगताचे नेते म्हणून पण मान्यता पावतात यात शंका नाही.
आजपर्यंत ज्ञानेश्वरांच्या साहित्यावर आणि त्यातील तत्त्वज्ञानावर सखोल अभ्यास झालेला आहे. ह.भ.प.सोनोपंत दांडेकर, स. के. नेउरगावकर, साखरे महाराज, जोग महाराज, कृ. के. आठवले अशा संत प्रवृत्तीच्या असंख्य मान्यवरांनी ज्ञानेश्वरांच्या तत्त्वज्ञानावर प्रासादिक लिखाण केले आहे. रा.चिं. ढेरे, पांगारकर, माटे, शं.रा. तळघटी अशा पुरातत्त्वातील आणि संत साहित्यातील अभ्यासकांनी यावर विस्तृत अभ्यासपूर्वक लेखन आणि चिंतन केलेले आहे. या लेखन प्रपंचाचा उद्देश ज्ञानेश्वरांचे तत्त्वज्ञान हा नसल्याने येथे हा विषय जास्त विस्तारपूर्वक मांडण्यात आलेला नाही. संत ज्ञानेश्वरांच्या कार्याचा कार्यकारण भाव शोधाणारा हा प्रामाणिक प्रयत्न आहे.
नाथ संप्रदाय आणि पंढरीची वारी असा दुहेरी वारसा ज्ञानेश्वरांना त्यांच्या स्वत:च्या आणि मातुल घराण्यातून मिळाला होता. तत्कालीन समाजातील शैव आणि वैष्णव पंथात सुरू असणा-या वर्चस्वाच्या लढाईमध्ये हा योगायोग खास लक्षात ठेवण्यासारखा आहे. ज्ञानेश्वरांचे पिता, विठ्ठलपंत जेव्हा तीर्थयात्रेला गेले तेव्हा ते प्रथम श्री पर्वतावर गेले असा उल्लेख आहे. श्री पर्वत आणि कदली बनाचे तत्कालीन धार्मिक जगातील महत्त्व अशाने नव्याने अधोरेखित होते यात शंका नाही. तत्कालीन वर्णाश्रम व्यवस्थेप्रमाणे ज्ञानेश्वरादि भावंडांना आरूढपतिताची संतती म्हणून दोल किंवा वोट म्हणत असत. या अनुशंगाने तत्कालीन समाजाने त्यांना दिलेली वागणूक माणुसकीच्या नात्याने जरी संपूर्ण अयोग्य होती तरी बोपोदेवसारखे पंडित देवगिरीमध्ये असताना तत्कालीन वर्णाश्रम व्यवस्थेप्रमाणे ते नियम समाज व्यवस्थेच्या चाकोरीतच होते असेच म्हणावे लागेल. लहानपणापासून भोगत असलेल्या हालअपेष्टा आणि अवहेलनेमुळे ज्ञानेश्वरांनी वैतागून जाऊन ताटी लावून बसणे आणि त्यामुळे मुक्ताबाईंना स्फुरलेले ताटीचे अभंग याचा साहित्य आणि तत्वज्ञान म्हणून अभ्यास झालेला आहे. मात्र सामाजिक आणि कौटुंबिक भावनेने याकडे बघणेही तितकेच गरजेचे आहे. ज्ञानेश्वरांपेक्षा वयाने लहान असलेल्या मुक्तेने योगी पावन मनाचा म्हणून केलेला उल्लेख खूप बोलका आहे. संत आणि योगी – सिध्द यातील फरक जाणण्यासाठी या अभंगाचा सखोल अभ्यास होणे आवश्यक आहे. ज्ञानेश्वर आणि त्यांचे कार्य कळण्यासाठी पावन मनाचा योगी म्हणजे काय हे कळले तर या संताकडे अजून वेगळ्या नजरेने बघता येईल.
गीता भाष्य ज्ञानेश्वरी, अनुभूती प्रकट करणारा अनुभवामृत ग्रंथ, सर्वार्थी तत्त्वज्ञानाचा मेरू म्हणता येईल असा चांगदेव पासष्ठे ग्रंथ, अभंग आणि विराणी अशा असंख्य साहित्यातून ज्ञानेश्वर आपल्याशी संवाद साधतात. मात्र, प्रकट गुह्य बोले, विश्व ब्रह्मची केले असे वर्णन असणारे ज्ञानेश्वर आजही सामाजिक परिवर्तनाचे नेते म्हणून, भावनिक संवेदनांचे उद्गाते म्हणून, शंकराचार्यांचा अद्वैतवाद आत्मानुभूतीमुळे समाजात रुजविणारे प्रेषित म्हणून, जनमानसाला एकत्र करून पंढरीच्या विठूमध्ये कैवल्य शोधत भागवत धर्माला प्रतिष्ठा मिळवून देणारे वारकरी म्हणून, मुकुंदराजाच्या विवेकसिंधू प्रमाणेच मराठीला उच्चासनावर बसविणारे मराठी संत कवी म्हणून सर्वच परिघात उपेक्षित राहून केवळ लहान बहिणीला पाठीवर मांडे भाजून देणारे आणि दगडी भिंत चालविणारे एक अध्यात्मिक जादूगार म्हणून राहिले आहेत हे आपल्या महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. मात्र आजही, ज्ञानेश्वरांची संजीवन समाधी आणि आसपासचा परिसर पुराततत्व शाखेवर विश्वास ठेवणा-या, इतिहासावर प्रेम करणा-या, मराठी साहित्याचा आदर करणा-या आणि भावनांच्या सावलीत रमणा-या कोणालाही सश्रद्ध, सात्विक किंवा चिकित्सक भावनेने संशोधनासाठी खुणावीत नाही ही मोठी शोकांतिका आहे.
निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ता यांचे कार्य, त्या मागचा कार्याकारण भाव, तत्कालीन जाणीवा आणि ज्ञानेश्वरांनंतर साधारण दीड वर्षात तिघांनीही घेतलेल्या समाध्या हे आजपर्यंत न सुटलेले कोडे आहे. वाचकहो, गरज आहे ती प्रत्येकाने प्रामाणिक साधक बनायाची.....
लेखक: डॉ. राहुल देशपांडे
अनेक वेळा लोकोत्तर महात्म्यांचे आयुष्य देवत्त्वाच्या वलयामुळे कायमच गूढ धुक्यात गुरफटून राहते आणि कापुरासारखे तेजाने झळाळून जाताना काही क्षण आसमंत सात्विक प्रकाशाने उजळवून स्वत:च आसमंतात विलीन होऊन जाते. समुद्राकाठच्या वाळूप्रमाणे काही बोचरे ओरखडे हातावर ठेवून अलगद निसटून जाणारे क्षण आणि या लोकोत्तर महात्म्यांच्या सर्वार्थी दर्शनाच्या आधी ब्रह्मांडात विरून गेलेल्या अभंगांच्या संवेदना अशाच काहीशा हुरहुर लावणा-या भावना पेरून जातात. आपल्या भाबड्या जाणिवांमुळे आणि संवेदनांवर साचलेल्या जाचक रूढी परंपरांच्या पांढरामुळे अनेक महात्मे त्या गूढ कथेतील नायक म्हणूनच जनमानसाच्या विचारांमध्ये उरतात तर काही पौराणिक कथांशी नाळ जोडत अवतार म्हणून देवघरात सजतात.
संत ज्ञानेश्वर...., तेराव्या शतकाच्या उत्तरार्धातील अध्यात्माच्या आकाशामध्ये आढळस्थानी असणारे इतिहासाचे एक अलौकिक पान. दीपकी दीपक I मावळल्या ज्योती I घर भरी वाती I शून्य झाल्या II ज्ञानेश्वरांचे कार्यही प्रकट झाल्यावर अशाप्रकारे केवळ साहित्यिक परिघातात तरी अडकून राहते किंवा सिध्दयोग्याचा मुकूट घालून अलौकिक पराशक्तीच्या क्षितिजाशी जोडले जाते. त्यांची केवळ तत्त्वज्ञ, कवी, सिद्ध, संत किंवा केवळ गीता भाष्यकार अशी कुठलीही एक ओळख नुसतीच अपूर्ण नाही, तर त्या लोकोत्तर पुरुषाचा अपमान करणारी आहे. म्हणूनच ज्ञानेश्वरांचे चरित्र पुरातत्वाच्या संशोधकांना, इतिहासाच्या अभ्यासकांना, तत्वज्ञानाच्या विचारवंताना, भाषाशास्त्राच्या व्याकरणकारांना, काव्यावर नितांत प्रेम करणा-या साहित्यिकांना, तत्कालीन समाजाला जाणून घेणा-या समाजशास्त्रातील अभ्यासकांना, संत साहित्यावर नितांत प्रेम असणा-या मराठी मनाला आणि भक्तीच्या पताका फडकविणा-या वारकरी संप्रदायातील साधकाला, अशा सर्वांनाच भुरळ घालणारे आहे.
![]() |
Dr. Rahul Deshpande |